
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे; जरांगे पाटलांवर हल्लाबोल…
हैदराबाद गॅझेटला ओबीसी समाजामधून विरोध होत आहे, हे गॅझेट रद्द करण्याची मागणी ओबीसी समाजाची आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी भूमिका समाजाची आहे, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जातीचे लोक एकत्र नांदत होते. दोन वर्षांपासून एका व्यक्तीने एका प्रवृत्तीने मी समाज म्हणत नाही, ओबीसी, एससी, एसटी आणि मराठा समाजात अंतर पाडलं. हे अंतर कुठून पडलं? आज माझी मराठा समाजाला नम्र हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त दोन समाजात अंतर पडलेले नाही. तर तुमच्याशीही तो दगाफटका करत आहे. उदाहरणासह सांगतो, १३ कोटी जनतेसमोर यावं, खरा फायदा मराठ्यांचा ओबीसीत नाही, त्यांचा फायदा ईडब्ल्यूएसमध्ये आहे. ओबीसीत का यायचं आहे तर मूठभर लोकांना सरपंचापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत जायचं आहे. यांना पेटवायचं आहे, असा हल्लाबोल यांनी धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, यांनी मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं आणि माझं काहीच सोडलं नाही. मला तर कधीपासून पाडीनच म्हणतो. भुजबळ साहेबांनाही म्हणतो, पाडीतोच. अरे १ लाख ४२ हजार मतांनी निवडून आलो आहे, पाडीतो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतो, आज आपल्या ओबीसींचं आरक्षण न्याय हक्कासाठी हा एल्गार मोर्चा आहे. आपल्या हक्काचं आरक्षण कुणाला देऊ द्यायचं नाही. किती डोकेबाज माणूस समजायचं. दसरा संपल्यावर म्हणतो धनगरांचं ९४ चं आरक्षण काढा. याला जीआर तरी कळतो का? वंजाऱ्याचंही आरक्षण काढतो. पण आज शपथ घ्या. आपसातील तंटे बाजूला ठेवा. नगर पंचायत, जिल्हा परिषदा या निवडणुका आहेत, असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.