फडणवीस तुमच्या परवानगीशिवाय; शेतकऱ्यांसाठी जरांगेंनी ठोकला शड्डू…
शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार असून कर्जमाफी न करता नेते कसे हिंडतात हे आम्हाला बघतोच, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. रविवारी २ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता अंतरवालीत शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
ही बैठक चर्चेसाठी आहे, शेतकऱ्यांनी येऊ नये, असे जरांगेंनी स्पष्ट केले.
आज (दि. २४) आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांनी सांगितलं की, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातील सगळे अध्यक्ष, पदाधिकारी, शेती तज्ञ आणि अभ्यासक यांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये. कोणीही फोनची वाट बघू नका, सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटीत २ तारखेला या. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणीही मागे हटायचे नाही. ही ऐतिहासिक लढाई होणार आहे. कोणत्या विषयावर लढाई लढायची यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफी कशी होत नाही बघतोच; जरांगे संतप्त!
या आंदोनाला तीन टप्प्यात जायचं आहे. २ तारखेला शेतकरी नेते, पदाधिकारी यांची बैठक होईल. नंतर आणखीन एक बैठक होईल. त्यात पुढील आंदोलन कधी करायचं याची तारीख जाहीर केली जाईल. सगळ्यांनी या लढ्यात इमानदारीने सहभागी व्हावं. कोणीही नेता बनण्याचा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांचा विजय करण्याचा उद्देश ठेवून एकत्र या. आंदोलनाला शेतकऱ्यांचे अर्धे लोकं उपस्थित राहतील आणि अर्धे लोकं शेतात राहतील. शेतकऱ्यांच्या पदरात न्याय पडणार असून शांततेत हे आंदोन होणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
नेते त्यांच्या प्रॉपर्टी व्यवस्थित राहण्यासाठी काम करतात. दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, आता कर्जमाफी कशी होत नाही, ते बघतोच, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
डाव टाकू नका; तुमच्या परवानगीशिवाय भुजबळ कोर्टात कसा गेला ?
यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला, हैदराबाद गॅझेट नुसार तातडीने प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम करा, तुम्ही डाव टाकू नका. तुम्ही मराठ्यांचे मन जिंकले ते कायम ठेवायचं असेल तर तातडीने हैदराबाद गॅझेट नुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करा. तुमच्या सरकारमधील लोकं हैदराबाद गॅझेट विरोधात कोर्टात जातात कसे? तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळने ५ याचिका कोर्टात दाखल कशा केल्या? हे तुम्ही तर करायला लावलं नाही ना? असा सवाल जरांगे यांनी केला आहे.
तुमच्यावरचा आमचा विश्वास ढळलेला नाही. तुम्हीच दिलं आता तुम्हीच घालवू नका. भुजबळ मंत्रिमंडळात राहिला नाही पाहिजे. येत्या कॅबिनेटला सातारा संस्थांनचे गॅझेट काढा. आमच्यात थांबायची क्षमता नाही. तुमच्या परवानगी शिवाय गॅझेट विरोधात याचिका दाखल करायची त्याची (भुजबळची) टप्पर नाही. तुम्ही जीआर काढला, भुजबळ त्याला विरोध करतोय. तुमचं बळ असल्याशिवाय तो लढू शकत नाही, असा आरोप जरांगेंनी फडणवीस यांच्यावर केला आहे.


