रवींद्र धंगेकरांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ; नवा बॉम्ब अन् गंभीर आरोप…
शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या नव्या पोस्टमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डींच्या जागेवरून धंगेकर-मोहोळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच रवींद्र धंगेकरांनी फेसबुकवरून पोस्ट शेअर करत नवा बॉम्ब टाकला आहे.
मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकरांनी पोस्टमधून केला आहे. तसेच पुरावा म्हणून पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबरही रविंद्र धंगेकर यांनी दिला आहे. बढेकर बिल्डर मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असून जैन होस्टेलच्या लिलावात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रवींद्र धंगेकरांनी पोस्टमध्ये काय काय म्हटलं आहे, ते पाहूयात….
पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत. परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतात. मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो, मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते. हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे. त्या गाडीचा नंबर होता Mh12 SW 0909 ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची. हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर….असे पोस्टमध्ये धंगेकरांनी म्हटले आहे.
‘हे’ प्रश्न केले उपस्थित
पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का..?
साडेनऊ हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता नाही आली का..?
या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले..?
विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत, असा दावा धंगेकरांनी केला आहे.
वेताळ टेकडी येथे टनेल ,HCMTR रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी माननीय इतके अतिउत्साही
आहेत की, त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला. तुम्हाला वाटेल की हे सर्व ते ट्राफिक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी करत आहेत. परंतु नाही गोखले, बढेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत. वेताळ टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत ,यासाठी त्यांनी हा घाट घातला आहे. अर्थात बिल्डर नावाला असतात हेच मालक असतात. आता हे शपथ पत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील..? याचा विचार न केलेला बरा.
या बढेकर बिल्डरचे मागच्या ५ वर्षातले बॅलन्सशीट काढले तर लक्षात येईल की यांनी किती कोटीच्या कोटी उड्डाणे सहज गाठली आहेत. अर्थात महापौरपद व केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रींग चा प्रकार या कंपनीतद्वारे केल्याचे लक्षात येईल. त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली आहे. खरंतर या बढेकर बिल्डर सोबत पार्टनरशिप ही दमदाट्या करूनच करण्यात आली होती. अगोदर दमदाट्या केल्या. त्या बिल्डरने वैतागून गुन्हा दाखल केला आणि मग महापौरांचा मोबाईल हॅक झाल्याचा कांगावा केला. आता बढेकर कंपनीत केवळ नावाला उरले आहेत. परंतु माननीय म्हणतील की,आता मी राजीनामा दिला आहे आणि बढेकर बिल्डरचे नाव जैन बोर्डिंग प्रकरणात येणं हा निव्वळ योगायोग आहे.
यांच्या अनेक प्रतापाकडे मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु ज्या दिवशी यांनी जैन मंदिराच्या विषयात अतिशय चुकीच्या पद्धतीने जागा लुटली तेव्हा मला हे प्रकरण लावून धरावं असं वाटले. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे आणि पुरावे देत असताना त्याची निपक्ष:पातीपणे चौकशी झाली पाहिजे. आपल्या देशात अनेक तपास यंत्रणा आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा तपास केला पाहिजे तर पुणेकरांची झालेली फसवणूक लुटमार लोकांच्या समोर येईल.
एक गोष्ट मी निश्चितपणाने सांगू इच्छितो, या पुण्यनगरीच्या विकासात आजवर अनेक महापौरांनी योगदान दिले परंतु यात अतिशय विक्रमी भ्रष्ट कारकीर्द राहिली ती विद्यमान खासदारांची. कुठल्याही कामाचे एक वर्षाचे टेंडर देण्याची पूर्वापार पद्धत बदलत 5/10/15/20 वर्षांचे टेंडर देण्यात आले. यामुळे महापालिकेची अतिशय दुरावस्था झाली ती यांच्या काळातच. असो…… जैन बोर्डींग प्रकरणी व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ही जमीन लुटणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी धंगकेरांनी पोस्टमधून केली आहे.


