 
                उदय सामंतांची महत्वाची माहिती; म्हणाले…
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह आदी शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा पार पडली.
यावेळी शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सूचवण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
तसेच ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करेल आणि त्यामध्ये समितीने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करून ३० जून २०२६ च्या आधी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनानंतर आता शिवसेना (शिंदे) नेते उदय सामंत यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर एक महत्वाचं भाष्य केलं आहे.
‘शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कशा पद्धतीने होणार? याचाही आराखडा तयार झाला आहे. येत्या जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने करणार आहोत, याची यादी तयार होईल’, असं उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
“शेतामध्ये असलेल्या भातापेक्षा शेतीमधून कापणी करून आणलेला भात, जो शेतकरी सुकवत होते, त्यावर पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामध्ये भाताचं नुकसान झालेलं असेल तर त्याबाबत भरपाई देण्यासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना महाराष्ट्र सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत”, असं मंत्री सामंत यांनी म्हटलं आहे.
“आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकार चालवत असताना शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे हे पाहिलं जातं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने दिलासा मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही सरकार चालवत आहोत आणि त्याची प्रचिती गुरुवारी आलेली आहे, असंही सामंत म्हणाले आहेत.
आता कर्जमाफी नेमकी कशा पद्धतीने होणार आहे? याचाही आराखडा तयार झालेला आहे. येत्या जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने करणार आहोत, याची देखील यादी तयार होईल, त्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. सर्वात महत्वाचं हे आहे की ज्या पद्धतीने शब्द आपण देतो, तो शब्द पाळण्याची ताकद देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये आहे, हे पुन्हा एकदा कालच्या निर्णयाने महाराष्ट्राला या तीन नेत्यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचेही आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. विरोधक टीका करतात, पण महायुतीचं सरकार कामाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देत आहे, असं उदय सांमत यांनी म्हटलं आहे.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                