दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
दि. ४ (जिल्हा परिषद, ठाणे) — मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, यासाठी अंतिम मुदत दि. १८ नोव्हेंबर, २०२५ निश्चित करण्यात आली आहे,अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही राज्य शासनाची महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते,मात्र ही मदत सतत मिळत राहण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे.
ई-केवायसी प्रक्रिया म्हणजे लाभार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी संबंधित माहितीची पडताळणी होय. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास लाभार्थ्यांना पुढील हप्त्यांचे अनुदान कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या खात्यात जमा होईल.
ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, महिला बालविकास कार्यालय किंवा जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) येथे जाऊन आपली माहिती अद्ययावत करावी. ई-केवायसी करताना आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक सोबत ठेवणे आवश्यक आहे.
ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यातील अनुदान रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करून योजनेंतील लाभ अखंडपणे सुरू ठेवावेत, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी केले आहे.



