100 टक्के खात्री पटली की…
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दुबार मतदारांवरुन दिलेल्या उत्तरामुळे राज ठाकरेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. आता 100 टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
“आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल असं आवाहन त्यांनी केलं आहे.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
पत्रकार परिषदेदरम्यान आयुक्तांनी सुलभ शौचालय आणि आयुक्तांच्या घराच्या नावे असणाऱ्या यादीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘मतदारयादीची यंत्रणा वेगळी आहे’ असं उत्तर दिलं. “आम्ही फक्त ती यादी स्विकारतो. आम्ही एक तारीख ठरवतो आणि त्यादिवशी ती स्विकारतो. दुबार, चुकीचा प्रभाग, विधानसभा यादीच नाव आहे पण इथे नाही ते समाविष्ट करतो”. एकूणच आयुक्त उत्तर देताना गोंधळलेले दिसले.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जसाठी अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
माघार घेण्याची मुदत – 21 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
मतमोजणी – 3 डिसेंबर
शासन अधिकृत निकाल – 10 डिसेंबर
आचारसंहिता लागू
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता जरी नगरपरिषद, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू असली तरी काही निर्णय, कार्यक्रम जर येथील मतदारांवर प्रभाव करणारे असतील तर तेदेखील आचारसंहितेमध्ये येईल असं सांगण्यात आलं आहे.
विभागनिहाय नगरपरिषद – नगरपंचायत निवडणुका
कोकण – 27
नाशिक – 49
पुणे – 60
छत्रपती संभाजीनगर – 52
अमरावती – 45
नागपूर – 55


