पुणे जमीन घोटाळ्यानंतर DCM अजित पवारांवर आणखी एक गंभीर आरोप !
पुणे (बारामती) : राज्यभरात सध्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वतनाच्या जमीन घोटाळा प्रकरण चर्चिले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं थेट नाव या घोटाळ्याशी जोडलं गेल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा इथपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपलं आहे. त्यातच आज बारामतीत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद घेत पुण्यातील प्रकरणासह राज्यभरातील वतनाच्या जमिनीची श्वेतपत्रिका काढण्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत बारामती तालुक्यातील व राज्यभरातील महार वतनाच्या जमिनी बळकवल्याबाबत चौकशी करण्याबाबतचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सदर पत्रात महार वतनाच्या जमिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या हस्तकांच्या नावे बऱ्याच प्रमाणात बळकावून समाजाला भूमिहीन केलं आहे. यात बऱ्याच महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप
‘पुण्यातील जमीन गैरव्यवहारात पार्थ पवार यांचं नाव असल्यानं त्यांना वाचविण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या अजित पवारांकडून होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर त्यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकलपट्टी करण्यात यावी. बारामती तालुक्यातील सोनगाव येथील (गट नंबर 353, मूळ मालक किसन धहाकू कांबळे) मात्र 1989 साली पार्थ अजित पवार यांनी अजित पवार राजकारणात जेव्हा नव्हते तेव्हापासून सत्तेच्या जोरावर महार वतनाच्या जागा लाटल्या आहेत’, असा गंभीर आरोप काळुराम चौधरी यांनी केला.
खासदार सुप्रिया सुळेंवरही निशाणा
‘कधीच जमीन घोटाळ्यात पार्थ पवार असं करणार नाही’ सुप्रिया सुळे यांच्या या वक्त्यावर त्यांना विचारलं असता चौधरी म्हणाले की, ‘सुळे यांनीही बारामती तालुक्यातील गोजुबावी गावातील महार वतनाची जमीन लाटली आहे. शारदानगर येथील शिक्षण संकुल ही महार वातनाच्या जमिनीवर उभारले आहेत’, असेही चौधरी म्हणाले.


