प्रचारात एकमेकांचे लचके तोडले; आता दिल्लीतील शिर्षस्थ नेतृत्व मध्यस्थी करणार…
मुंबई: महापालिका निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) फटका बसू नये, यासाठी आता हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट पक्षांतील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील शिर्षस्थ नेतृत्व मध्यस्थी करणार अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर आली आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला पोहोचला आहे. प्रचारसभादरम्यान, दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.अशात, महापालिकेत फटका बसू नये म्हणून दिल्लीतील नेते मध्यस्थी करणार आहेत.
प्रचारादरम्यान भांडून झाल्यानंतर मैत्रीची आठवण कशी झाली?
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी प्रचारात एकमेकांचे हवे तेवढे लचके तोडले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. परंतु तेव्हाही मध्यस्थी झाल्याचं पाहायला मिळाली नाही. पण आज प्रचार संपत असताना शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षातील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील शिर्षस्थ नेतृत्व करणार असल्याची माहिती महायुतीमधील नेते देत असल्यामुळे प्रचारादरम्यान भांडून झाल्यानंतर मैत्रीची आठवण कशी झाली? असा प्रश्न समोर येत आहे.
निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस-
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज सभा पार पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांची संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीडमध्ये सभा होणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या त्रंबकेश्वर, संभाजीनगरमध्ये तर अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यसह नाशिकच्या भगूरमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस कसा गाजतो ते पाहावं लागेल.
