‘या’ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी…
पालघर आणि वसई-विरार भागात पारंपरिकपणे शिवसेनेचा मजबूत हक्काचा मतदार मानला जात होता. मात्र २०१४ नंतर भाजपने पालघर जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आणि नंतर वसई-विरार महानगरपालिकेतही शिरकाव केला.
भाजपची वाढती ताकद एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर प्रथमच वसई तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील निवडणुकीसाठी नवी रणनीती आखण्यात आली.
संपर्कप्रमुख म्हणून पांडुरंग पाटील यांची नियुक्ती
बैठकीत एकनाथ शिंदे यांनी पांडुरंग पाटील यांच्यावर वसई तालुक्यात पक्षवाढ आणि संपर्कप्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पाटील यांनी यावेळी जोरदार गर्जना केली की, आम्ही पुन्हा शिवसेनेचा भगवा डौलने फडकवू आणि वसई-विरारमध्ये शिवसेनेची परंपरागत ताकद पुन्हा प्रस्थापित करू.
कार्यकर्त्यांना आवाहन
पांडुरंग पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले, सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने मांडा आणि ते सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करा. शासनाच्या असंख्य कल्याणकारी योजनांचा लाभ शिवसेना शाखांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा.
शाखा मजबूत करण्यावर भर
पाटील यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेचा मुख्य आधार असलेल्या शाखा मजबूत करण्यावर विशेष लक्ष देणार आहोत. शाखांमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या सोडवणे हे प्राधान्य राहील. शाखांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाईल. तसेच संघटनात्मक रचना मजबूत करण्यासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा त्वरित भरण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेनेत नवचैतन्य
बैठकीत पांडुरंग पाटील यांनी सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांना पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरित केले. यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका हेमलता सिंग यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीचे आयोजन जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर यांनी केले होते. यावेळी जिल्हा सचिव अतुल पाटील, जिल्हा संघटक शीतल कदम यांच्यासह शिवसेना आणि संलग्न संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
