ममता बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल !
भाजपला आसामच्या स्थानिक लोकांच्या मतांवर विश्वास नाही. त्यामुळे, निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाने बाहेरून लोकांना आणले. उत्तर प्रदेशातून ५०,००० लोकांना रेल्वेने आसाममध्ये आणण्यात आले आहेच.
म्हणूनच एकवेळ सापावर विश्वास ठेवता येतो, पण भाजपवर कधीच नाही, अशा शब्दांद पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तेंतुलिया येथे एका निवडणूक सभेला त्या संबोधित करत होत्या.
बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले की, भाजपच्या राजवटीत देशातील कोणतीही यंत्रणा निष्पक्ष नाही. भगव्या पक्षाने सर्व यंत्रणा विकत घेतल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेदरम्यान ९० लाख नावे वगळण्यात आली आहेत.
या ९० लाख नावांपैकी ६० लाख हिंदू आणि ३० लाख मुस्लिम आहेत. आसाम एनआरसीमध्येही साधारण हीच स्थिती आहे. त्या यादीतून १९ लाख नावे वगळण्यात आली होती. अशा यादीत १३ लाख हिंदू आणि ६ लाख मुस्लिमांचा समावेश होता. म्हणून लोकांनी भाजपवर कधीही विश्वास ठेवू नये.
