ठाणे प्रतिनिधी-नागेश पवार (05) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहरातील काही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवार, 7 मे 2026 रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार, 8 मे 2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत हा शटडाऊन लागू राहणार आहे.
जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय (HSR) येथे बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक १, २ व ३ वर उन्नतीकरण तसेच तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे.
या कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31) मधील काही भाग वगळता), कळवा या प्रभाग समित्यांतील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
