
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
ज्याठिकाणी बिलाड्या बाबांनी रोप लावत त्यांचे संवर्धन केले आहे ती जमीन वनविभागाची आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या बिलाड्या बाबांना मानवी दृष्टिकोनातून व त्यांच्या सद्भावनेचा विचार करून संबंधित विभागाने त्यांच्या कार्यास प्रोत्साहन द्यायला हवे अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
स्वतः त्याठिकाणी जात बिलाड्या वळवी यांचे काम पाहिले. वृक्षतोड एवढया मोठ्या प्रमाणावर झाली आहे की एकटा वनविभाग अपुरा पडतोय. मात्र बिलाड्या बाबांमुळे आज त्याठिकाणचा परिसर पूर्णतः हिरवागार झाला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्यास सलाम.
बोडका झालेल्या सातपुड्याच्या परिसराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अतिदुर्गम भागातील एक सत्तर वर्षीय तरुण झटतोय. त्यांनी गेल्या वीस वर्षात तब्बल पंचवीस हजारांहून अधिक रोपं स्वखर्चाने लावीत, दुर्दम्य इच्छाशक्ती व अथक परिश्रमांचा जोरावर जवळपास सतरा हजार रोपांचे संवर्धन करीत असलीचा परिसर हिरवागार केला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून त्यांनी इतरांपुढे एक आदर्श ठेवला आहे असे बोलले जात आहे.
सातपुड्याच्या परिसरात पूर्वी विपुल प्रमाणात जंगल संपदा होती, मात्र कालांतराने ती नष्ट झाली. सातपुड्याच्या परिसर पुन्हा एकदा हिरवागार होण्यासाठी शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना काम करीत आहेत. असाच एक प्रयत्न बिलाड्या जुगला वळवी (वय ७०) रा. असली (महूपाडा) ता. अक्राणी या वृद्धाने चालविला आहे. सातपुड्यातील इतर भागांप्रमाणेच असलीचा परिसर देखील बोडका झाला. नष्ट झालेली वनसंपदा पुन्हा नव्याने प्राप्त करण्याचा चंग बिलाड्या बाबांनी मनाशी बांधला. त्यासाठी त्यांनी असली येथील वनविभागाच्या अख्यारित येणाऱ्या सुमारे ६० एकर जागेवर गेल्या वीस वर्षांत २ हजार आंबे, ४ हजार सागवान, ५ हजार बांबू आणि चारोळी, महू, आवळा अश्या इतर जातींची १४ हजार अशी एकूण २५ हजारांहून अधिक रोप स्वखर्चाने लावलीत. बिलाड्या बाबांनी त्याचपरिसरात एका झोपडीत राहत, लावलेल्या रोपांचे संवर्धन केले. प्रसंगी त्यांना साप व इतर हिंस्त्रप्राण्यांना तोंड द्यावे लागले मात्र न डगमगता त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले.
बिलाड्या बाबांनी रोप तर लावली मात्र पाण्याची सोय नसल्याने, रोपांना पाणी कसे द्यायचे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी माथा असलीच्या दुसऱ्या घाटातून स्वतः चारी खोदून त्याद्वारे पाणी उपलब्ध केले तसेच वेळप्रसंगी डोक्यावर पाणी वाहत रोपांना पाणी दिले. एकीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असतांना बिलाड्या बाबांनी अथक परिश्रम घेत असंख्य अडचणींना तोंड देत लावलेल्या रोपांचे संवर्धन केले. त्यांना बाहेरगावी नोकरीला असलेला मुलगा विजय वळवी यांची साथ लाभली असून विजय वळवी त्यांना दरवर्षी हजारोंच्या संख्येने विविध जातींची रोप आणून देतात. त्यामुळे आज जवळपास सतरा हजार वृक्ष त्याठिकाणी असून सदर परिसर हिरवागार झाला आहे.