
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-
फिरत्या वाहनाच्या माध्यमातुन योजनेची प्रसिद्धी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना घेता यावा यासाठी योजनेची माहिती दर्शविणाऱ्या चार फिरत्या वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखविली.फिरत्या वाहनांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती,वैशिष्ठ्ये सांगण्यात येणार आहे.ही केंद्र शासनाची योजना असुन फिरत्या वाहनाच्या माध्यमातुन या योजनेची जिल्हाभर प्रसिद्धी करण्यात येत आहे.जिल्ह्यातील अमरावती,चांदुर रेल्वे,धामणगाव व भातकुली या तालुक्यात ही फिरती वाहने रवाना करण्यात आली.
कर्जदार,बिगर कर्जदार व भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज नोंदणी प्रक्रिये पुर्ण करण्यासाठी ‘आपले सरकार’ या केंद्रावर सुविधा निर्माण करण्यात आली असुन ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन श्रीमती पवनीत कौर यांनी केले.
नैसर्गिक आपत्ती,किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे,सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे व शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक योजना राबविण्यात येत आहे.यावर्षी खरीप हंगाम योजना २०२२-२३ मध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या योजनेची अंमलबजावणी करीत आहे.तांदुळ,ज्वारी,सोयाबीन,मुग,उडीद,तुर व कापुस पिकांचा खरीप हंगामात समावेश आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन व्यवहारे,विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान,विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी नितीन सावळे आदी यावेळी उपस्थित होते.