दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-भारतीय डाक विभागाव्दारे सुकन्या समृध्दी योजना ही एक चांगली लाभांश देणारी योजना संपूर्ण देशात मुलींसाठी राबविली जाते.शुन्य ते दहा वयोगटातील लहान मुलींसाठी ही योजना असून मुलींचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी नागरिकांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले. अमरावती जिल्हा हा सुकन्या समृध्दी योजनेच्या अंमलबजावणीत अग्रेसर राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी व्यापक जनजागृती करावी,असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुकन्या समृध्दी योजनेबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.भारतीय डाक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राच्या प्रवर अधीक्षक डॉ.वसुंधरा गुल्हाने,डाकघर निरीक्षक रविंद्र रोतडे,सहायक अधीक्षक अतुल काळे,महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती कौर म्हणाल्या की,सुकन्या समृध्दी योजना ही लहान मुलींच्या भविष्यात खरोखरच समृध्दी आणणारी योजना आहे.शुन्य ते दहा वर्षे वयोगटातील मुलींच्या भविष्यातील शिक्षण व लग्नकार्य,वैद्यकीय उपचार आदी महत्वपूर्ण कार्यासाठी या योजने अंतर्गत मिळणाऱ्या भरीव निधीचा उपयोग होऊ शकतो.वर्षाला अडीचशे रुपये किमान रक्कम भरुन या योजनेत सहभागी होता येत असून कमाल दिड लाख रुपये योजनेच्या खात्यात जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक बालिकांचा योजनेत समावेश करण्यासाठी महिला व बालविकास विभाग,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग,महानगरपालिका,नगरपालिका/नगरपरिषद प्रशासन व इतर शासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालये व अधिकारी-कर्मचाऱ्यांना तालुका व ग्रामीण भागात योजना व योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभाविषयक माहिती जनतेला द्यावी.संपूर्ण अमरावती जिल्हा सुकन्या समृध्दी योजनांचा लाभार्थी जिल्हा नावलौकीक मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे,असेही श्रीमती कौर म्हणाल्या.
सुकन्या समृध्दी योजनेत सहभागी होण्यासाठी रु. २५०/- खाते सुरू करणे आवश्यक असून वर्षाला किमान २५०/- रुपये तर कमाल दिड लक्ष रुपये जमा करता येतील.जमा खाते शुन्य ते दहा वर्षे वयोगटातील मुलींच्या आई-वडीलांना उघडता येईल.एक बालिकेसाठी एक खाते स्वीकारण्यात येणार असून एका कुटुंबात फक्त दोन खाते सुरू करता येतील.योजने अंतर्गत निर्माण करण्यात आलेले खाते वयाच्या २१ वर्षाला परिपक्क होईल तसेच बालिकेच्या १८ वर्षे वयाला जमा खात्यातील ५० टक्के रक्कम काढता येईल.योजनेंतर्गत ७.६ टक्के व्याजदर दिल्या जाणार असून देशातील कोणत्याही पोस्ट ऑफीसमध्ये जमाखाते वळते केले जाऊ शकते,अशी माहिती सहायक अधीक्षक श्री.काळे यांनी यावेळी दिली.


