
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी प्रकल्प विरोधात बातमी दिल्यामुळे अंगावर चारचाकी वाहन घालून जाग्यावर ठार मारले आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर योग्य ती कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.10 फेब्रुवारी रोजी केली आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दैनिक महानगरी टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी विरोधात वृत्त दिले होते. त्यामुळे राजापूर हायवे येथे रिफायनरी समर्थक जमीन दलाल यांनी शशिकांत वारीशे यांच्या अंगावर वाहन घालून मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे दोषी आरोपी गावगुंड याच्यावर सदोष मनुष्यबादाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्याला अद्यापपर्यंत अटक केली नसून तो मोकाट फिरत असल्यामुळे त्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या आरोपीस कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर महावीर बनसोडे, रविंद्र लोमटे,अषिश बाबर, तानाजी सुपेकर,नवनाथ यादव,शाम पालके,चंद्रमणी गायकवाड, प्रदीप साठे,आसिफ जमादार,अजित बागडे,दत्ता अहिरे रोहित चंदनशिवे उदय साबळे आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.