
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक -मोहन आखाडे
सध्या देशात दिवसेंदिवस H3N2 विषाणूचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे देशात H3N2 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. व्हायरल इन्फ्लूएंझा (Influenza) म्हणजेच H3N2 विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. दरम्यान आता H3N2 विषाणूची छत्रपती संभाजीनगर शहरात देखील या व्हायरसने शिरकाव केला आहे. तर ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरांत आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, नेहमी हात धुवावेत, गर्दी टाळावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोना संसर्गाची लाट येणार म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. पण कोरोना साथ आलीच नाही, असे असले तरी आता वातावरणातील बदलामुळे घराघरांत ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. H3N2 या व्हायरसचे हे रुग्ण आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने राज्यांना सतर्क केले आहे. विशेष म्हणजे मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण या व्हायरसचे शिकार बनल आहेत.
शहरात सध्या व्हायरलची म्हणजेच H3N2 या व्हायरसची साथ असून, रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) म्हणजेच यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, H3N2 हा एक गैरमानवी इन्फ्लूएंझा विषाणू आहे. हा विषाणू सामान्यतः डुकरांमध्ये पसरतो आणि मानवांमध्ये संक्रमित होतो. त्याची लक्षणे हंगामी फ्लूसारखीच असतात. H3N2 विषाणूची लागण झाल्यावर ताप आणि श्वसन संसर्गाची लक्षणे दिसतात. खोकला किंवा नाक वाहणे तसेच अंगदुखी, मळमळ, उलट्या किंवा अतिसार यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात.
कोरोनापासून सुटका झाली असली तरीही आता H3N2 या नवीन व्हायरसने सर्वांची चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे हा व्हायरस झापाट्याने पसरत असून लोकांमध्ये दहशत दिसून येत आहे. तर H3N2 या व्हायरसमुळे देशात दोघांचा बळी गेलाय. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून, सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर केल्या आहेत. ज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.