दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी : कारंजा(घा) तालुक्यातील पारडी ते नागपूर -अमरावती राष्ट्रीय महामार्ग व पारडी ते आष्टी रस्त्याचे नुतनीकरण करण्याची मागणी बाबतचे निवेदन तहसीलदार कारंजा(घा) यांना देण्यात आले. कारंजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पारडी गावाची ओळख आहे या गावला जोडणाऱ्या परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत आहे. पारडी ते नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे. परिसरातील अनेक गावांचा पारडी ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला पारडी ते सारवाडी फाटा रस्ता खड्याच्या विळख्यात सापडला आहे. या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पारडी, पालोरा, एकांबा, बोटोना या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांना पारडी येथे बँक, दवाखाने, खते-बियाणे खरेदी करण्यासाठी यामार्गे प्रवास करावा लागतो. मात्र, रस्त्यांची बिकट अवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना या खड्डेमय रस्त्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परिसरातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पारडी ते आष्टी या रस्त्याने गाडी चालणे सुद्धा मुश्किलीचे झाले आहे. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याचे नुतनीकरण झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ दिवसांत यावर कार्यवाही करावी. अन्यथा मोठ्या प्रमाणत आंदोलन करण्यात येईल अशा इशारा पारडी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे काही दिवसापूर्वी तात्पुरते थातूरमातूर खडीकरण केले, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही रस्त्याची परिस्थिती जैसे थे तशीच आहे. पारडी, हेटी (पारडी), एकांबा व पालोरा येथील नागरिकांच्या शेती या रस्त्यालगत आहे.शेतकऱ्यांना ही त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याची झालेली दुरवस्था व गंभीर परिस्थिती पाहता प्रत्येक नागरिक शाळकरी मुले, दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहतूक प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघातांची मालिका सुरू झालेली आहे. आष्टी – थार – बोटोना – पारडी रस्ता जीवघेणा ठरत आहे. गर्भवती महिलाना धोका निर्माण होत आहे. सदर रस्त्यावरून ये जा करण्याऱ्या गर्भवती महिलांच्या गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे, चिमुकल्याला जगात येण्याआधी जगाचा निरोप घ्यावा लागतो आहे. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थी, नागरिक, महिला, दुग्धव्यवसाय करणारे व्यावसायिक, वृद्ध मंडळी या रस्त्यामुळे सर्वाना येत आहे कुठले ना कुठले आजारपण येत आहे.रस्ता सोडून बाजूने मार्गक्रमण नागरिक करताहेत अशी असणारी परिस्थिती आहे.
रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती, डांबरीकरण व नूतनीकरण याची सर्व जबाबदारी बांधकाम उपविभाग यांच्यावर राज्य सरकारने निश्चित केली आहे. रस्ताचे नुतनीकरण करून नागरिकांना त्रासातून मुक्तता द्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून पारडी ग्रा.पं.सदस्य राखीताई पाटीलसह तेजस्वीनीताई यावले,प्रभाताई पाठे यांनी निवेदनातून केली आहे.
