
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती : जिल्ह्यातील भौगोलिक,परंपरागत व्यवसाय व नवीन तंत्रज्ञानाचा आधारे रोजगार व स्वयंरोजगारासाठी मागणी लक्षात घेवून कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करा.यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी येथे दिले.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविण्यता सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर,समाजकल्याणचे सहायक आयुक्त माया केदार,कामगार उपायुक्त संगिता गुल्हाणे,संत गाडगेबाबा विद्यापीठचे अंकिता पाडोले,अनिल कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील लोकांसाठी ग्रामस्तरावर प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे.त्याअनुषंगाने ग्रामीण भागाच्या आवश्यकतेनुसार कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे.विविध औद्योगिक संघटना,शासकीय विभाग यांच्या समन्वयाने कौशल्य विकास आराखडा तयार करावा.स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य प्रशिक्षणे उपलब्ध करुन द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाविन्यपुर्ण संकल्पनांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज ’ राबविण्यात येत असुन महाविद्यालयांनी नोंदणी करून अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग मिळवून द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.