
महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नेते मंडळी एकमेकांची उनीधुनी काढण्यात व्यस्त आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे राजकारण, भाजप आणि भविष्यात भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी त्यांच्याबरोबर का जाऊ? त्यांनी माझा पक्ष तोडला, माझा पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला, माझ्या कुटुंबाची बदनामी केली, माझ्या मुलाची बदनामी केली, असेही ते म्हणाले.
मी कुठेही गेलो नाही, आधी भाजपने मला सोडले- उद्धव ठाकरे
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडून वेगळी युती करणाऱ्या राजकीय पक्षांवर उद्धव ठाकरे म्हणाले, मी एका जागी आहे. मी कुठेही गेलो नाही. 2014 मध्ये भाजपने मला सोडले होते. 2019 मध्ये त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला. तो कुठेही जाऊ शकतो, मी जाऊ शकत नाही. मी तिथेच आहे. त्यांनी मला फसवले, माझ्यावर आरोप केले. त्यामुळे नंतर मी भाजपला सोडले असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप सत्ता जिहाद करीत आहे
पंतप्रधान मोदींच्या व्होट जिहादच्या आरोपावर उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपवाले स्वतः सत्ता जिहाद करतात. ते करतात ते सत्ता जिहाद, खुर्ची जिहाद. आज ते लोक जे काही आहेत ते माझ्या वडिलांचे कार्य आहे. पुठे उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपच्या विश्वासघाताने मी मुख्यमंत्री झालो तर मला विश्वासघात करून का काढले? माझ्या वडिलांनी त्यांना सर्व काही दिले, त्यांचा मुलगा सीएम झाला तर काय अडचण आहे ते म्हणाले.
या कारणासाठी दिला नाही अमित ठाकरेंना पाठिंबा
आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा राज ठाकरेंनी उमेदवार उभा केला नव्हता, पण यावेळी त्यांचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असताना तुम्ही असा पुढाकार घेतला नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव म्हणाले की, राज ठाकरेंची राजकीय भूमिका काय आहे याचा मी खूप विचार केला. त्यांनी गेल्या निवडणुकीत मोदींना पाठिंबा दिला होता. आता ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे म्हणत आहेत. म्हणूनच ज्या लोकांनी महाराष्ट्र लुटला त्यांना मी पाठींबा देणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.