
संतोष देशमुख हत्या-खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची मोठी कबुली
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि येथील पवनचक्कीला दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या विष्णू चाटे याने सीआयडीच्या चौकशीत मोठी कबुली दिली आहे.
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विष्णू चाटे याने चौकशी दरम्यान मोठी कबुली दिली आहे.
वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं, वाल्मिक कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचं चाटेने चौकशीदरम्यान सांगितलं. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात मोठा खुलासा केला आहे. विष्णू चाटे याच्या फोनवरून कराडने धमकी दिल्याची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. कराडने कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटेने कबूल केलं आहे
बीडमधील खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याने सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं आहे. मात्र गेल्या दोन दिवसात त्याने वैद्यकीय मदतीची मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्याला स्लिप अॅप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. या आजारासाठी कराडला ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचा दावा त्याने केला आहे. मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची विनंती कराडकडून करण्यात आली आहे. मशीन चालवण्यासाठी रोहित कांबळे नावाच्या तरुणाला मदतीसाठी देण्याची मागणी केली आहे. मशीन वापरण्यासाठी रोहित कांबळेने प्रशिक्षण घेतले असल्याचा दावा केला आहे. मशीन चुकीच्या पध्दतीने लावल्यास आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा कराडने केला आहे.