मिनी पाकिस्तानातून निवडून येतो, भाजप नेते सुरेश खाडे यांचे वक्तव्य
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कामगार मंत्रालयासारखे संवेदनशील खाते सांभाळलेले माजी मंत्री सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून आलो, असे म्हणत सुरेश खाडे यांनी मतदारांना जाहीरपणे अपमान करण्याचा उद्दामपणा दाखवला, निमित्त होते हिंदू गर्जना सभेचे…!
सांगली शहरात हिंदू गर्जना सभा पार पडली. या सभेला मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी मंत्री सुरेश खाडे यांच्यासह शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेला उद्देशून भाषण करताना हिंदूराष्ट्राची गर्जना खाडे यांनी करीत केंद्र सरकार त्यादृष्टीने पाऊल टाकते आहे, त्याला आपली साध हवी असल्याची विनंती त्यांनी केली. दोन-चार मिनिटांच्या भाषणात मिरज मतदारसंघाला ‘मिनी पाकिस्तान’ची उपमा देऊन त्यांनी मतदारांचा जाहीर अवमान केला तसेच धर्मनिरपेक्ष संविधानावर चालणाऱ्या देशाला हिंदूराष्ट्राकडे नेण्याचा इरादा बोलून दाखवला.
विरोधी पक्षाची खिल्ली उडवली
लोकसभेला निसटता पराभव झाला पण विधानसभेला हिंदू समाजाने ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणांचे महत्त्व लक्षात घेऊन अतिशय चांगले काम केले. त्यामुळेच विधानसभेत आता विरोधकांचे किरकोळ स्थान राहिले आहे. संपूर्ण विधानसभेत आता आपलेच लोक दिसतात, केवळ छोटीशी गल्ली आता विरोधकांसाठी राहिलेली आहे. येतात-बसतात-जातात बोलायला काही संधी नाही. विरोधी पक्षनेताही नाही, अशी विरोधी पक्षाची खिल्लीही खाडे यांनी उडवली.
दलित असलो तरी हिंदू आहे, हिंदूराष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाहीत
आम्ही हिंदू चांभार आहोत. दलित असलो तरी हिंदू आहोत. हिंदूराष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाहीत. हिंदू राष्ट्र झाले तर अजिबात चिंता नाही. केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी एकएक पाऊल हिंदू राष्ट्राच्या दिशेने टाकत आहे. त्यांच्या प्रयत्नांना आपली साथ हवी आहे, असे खाडे म्हणाले. हिंदू राष्ट्र झालेच पाहिजे, अशी आपलीही मागणी असल्याचे खाडे म्हणाले.
नितेश राणे बरळले
दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांनीही हिंदू राष्ट्राचा निर्धार करताना विरोधकांवर हल्लाबोल केला. आमचे विरोधक ईव्हीएमविरोधात बोलत असतात. पण ‘ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’असे वादद्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले. हे वक्तव्य करीत असताना मंत्रिपदाच्या शपथेवेळी घेतलेल्या पद आणि गोपनियतेच्या शपथेचा त्यांना पूर्णपणे विसर पडला.
