
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला दिलासा मिळाला आहे. वाल्मिक कराडविरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.
त्याशिवाय, हायकोर्टाने याचिकाकर्त्याला 20 हजारांचा दंड ठोठावला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हाच नव्हे तर राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी केली असल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराडविरोधात रान उठवण्यात आल्यानंतर त्याच्या अनेक संपत्ती आणि कारनामे समोर आले होते. सुरुवातीला देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली. त्यानंतर आता कराडसह इतर आरोपींना आता हत्या प्रकरणातही अटक करण्यात आली असून मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडने बेकायदेशीर कृत्य करत बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला. त्याची कोट्यवधींची संपत्ती असल्याचेही समोर आले.
ईडी चौकशीसाठी याचिका…
या सगळ्या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराडची ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. मात्र, हायकोर्टाने गी याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल 20 हजारांचा दंड ठोठावला. तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेण्याचं मान्य केले.
हायकोर्टाने याचिका का फेटाळली…
याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी जनहित याचिका दाखल केली होती. मात्र याचिकाकर्त्यांचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्यानं याचिका सुनावणीस योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींचा व्यक्त करत सुनावणीस नकार दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत सुरू करण्याचीही मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्याचं नाव सातत्यानं येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला. या प्रकरणी मंत्री महोदयांशी संबंधित अनेक कंपन्या आणि मालमत्तासमोर येत असल्यानं याचिकेत निवडणूक आयोगालाही प्रतिवादी करण्यात आले होते.