
आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा!
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. मुलीची परीक्षा असल्याने देवेंद्र फडणवीस ५०० मीटरवर राहायला जात नाही.
मग त्यांना मराठ्यांच्या मुलांबाबत ही माया येत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. ”देवेंद्र फडणवीस यांची नियत चांगली नाही. त्यांची जशी स्वत:च्या लेकीसाठी तळमळ आहे, तशी तळम त्यांना मराठा समाजाच्या मुलांसाठीही असायला हवी. आमचं EWS त्यांनी घालवल आणि खापर आमच्यावर फोडत आहेत. मराठा समाजाच्या चार विद्यार्थ्यांनी काल आत्महत्या केल्या मात्र. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही?” हा भेदभाव आहे, अशी टीका त्यांनी केली
देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मुलीची परीक्षा असल्याने ५०० मीटरवर असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला जात नाही. मग मराठ्यांच्या मुलांबाबत ही माया का नाही? ते मराठ्यांच्या विद्यार्थांना आरक्षण का देत नाही? ५०० मीटर राहायला गेलं तर काय बिघडतं? पण शिक्षणाला फडणवीस महत्व देतात. स्वतःच लेकरु मोठं करायचं हा फडणवीस यांचा संदेश आहे. मराठ्यांनी यातून बोध घ्यावा”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मुलांसाठी वेगळी आणि दुसऱ्यांच्या मुलांबाबत वेगळी भूमिका घेत असतील तर वेगळं आंदोलन करावे लागेल, लवकरच मी मुंबईत शिवाजीपार्क किंवा आझाद मैदानाची पाहणी करायला जाणार आहे. आरक्षणासाठी आम्ही लवकरच मुंबईत आंदोलन करणार आहोत”, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
आम्ही लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करू, एकदा आंदोलन सुरु केलं की आम्ही उठणार नाही. आता कायम मुंबईत बसणार. मुंबईत जाऊन उपोषण करणार नाही. आमची शक्ती दाखवू. आंदोलनाच स्वरूप आम्ही सांगणार नाही, गनिमी कावा आंदोलन करणार आहोत”, असंही त्यांनी सांगितलं.
माझी प्रकृती आता बरी आहे. मला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळणार आहे. मराठा समाजाच्या एकाही विद्यार्थ्यांने आत्महत्या करू नये. एका टक्क्याहून हुकलात तरी पुन्हा लढून जिंकू पण आत्महत्या कुणीही करू नये. सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही,असंही ते म्हणाले.