
काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य…
नागपूर हिंसाचार प्रकरणी परिस्थितीची पाहणी करायला आलेले काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांना काँग्रेसच्या पाहणी समिती संदर्भात आणि त्यास वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीक संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.
त्यावर उत्तर देताना हुसेन दलवाई यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबचा इतिहास समजून घेण्याचा सल्ला दिला. यापुढे दलवाई म्हणाले की संभाजी महाराजांना ( छत्रपती संभाजी महाराज ) औरंगजेबाने ज्या पद्धतीने मारले, ती क्रूरता होती. मात्र, औरंगजेबाने त्याचा भाऊ दाराशिकोहला जसं मारलं होतं, त्याच पद्धतीने औरंगजेब ने संभाजी महाराजांनाही मारले. मात्र, संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडितानी सांगितल्याचा दावा हुसेन दलवाई यांनी केला. इतिहासाचा हा पैलू फडणवीस मान्य करतील का? वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही, असे हुसेन दलवाई यांनी म्हटले.
दरम्यान प्रशांत कोरटकर तेलंगणामध्ये एका काँग्रेस नेत्याच्या घरी सापडले, या भाजपच्या या आरोपाबद्दल हुसेन दलवाई यांनी सावध प्रतिक्रिया दिली. तेलंगणामधील कोण नेता आहे, तो काँग्रेसचा नेता होता की RSS चा नेता होता हे मला माहीत नाही. तो काँग्रेसचा नेता असेल, तर कदाचित त्याला माहीत नसेल की प्रशांत कोरटकर कोण आहे? हा (कोरटकर) त्याला भेटायला गेला असेल, म्हणून ते भेटले असतील, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न हुसेन दलवाई यांनी केला.
नितेश राणेंविरोधात आंदोलनाची हाक
नागपुरातील हिंसाचारात मुस्लीम धर्माची पवित्र कलमेच्या चादरीवर पायांनी स्पर्श करणे आणि पवित्र कलमेची चादर जाळून अपमान करणे आणि चिथावणीखोर भाषण करुन दोन समाजात तेढ निर्माण करणारे मंत्री नितेश राणे , RSS, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी. तसेच नितेश राणे यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी विधानभवनाच्या गेटसमोर आंदोलन करण्याची हाक शेख आसिफ अहमद यांनी दिली आहे.
नागपूरच्या हिंसाचाराला दोन्ही बाजू जबाबदार, अंबादास दानवेंचं वक्तव्य
नागपूरमध्ये दोन्ही बाजू जबाबदार आहेत. मुख्यमंत्री मान्य करत नसले तरी माझ्याकडे काही व्हिडीओ आहेत. नागपूरात तज्जुद्दीन बाबा दर्गा आहे. त्याठिकाणी नितीन गडकरी यांची पहिली चादर असते. नागपूरमध्ये चादर जाळली त्यावर कुराणच्या काही ओळी लिहिल्या होत्या त्यामुळे हा प्रकार घडला. तुम्हाला नितीन गडकरी मोदी यांनी चादर चढवली तर चालते मग नागपूरमधे काय झालं? अबू आझमीला अद्याप का अटक केली नाही याच उत्तर द्या, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
आपण कबर आणि बाबर उकरून काढतोय, आपण कोणत्या जमान्यात चाललोय. कबरीवर चढवली जाणाऱ्या चादरीवर कुराणाची आयात लिहिलेली असते. मग ही चादर पायदळी तुडवली गेली जाळली गेली, यामुळे काही लोकांच्या भावना भडकल्या. नितिन गडकरी आणि पंतप्रधान अजमेर शरीफ येथे चादर चढवतात ते चालते. या राज्यात कायद्याचा धाक येणं गरजेचे आहे. हा उत्तर प्रदेश नाही. दंगल करणारा दोषी आहे, तसा कामराचा स्टुडिओ तोडणारे पण दोषी आहेत. बुलडोजर सगळीकडे लावा, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.