मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलंत जीवन संपवलं आहे. हरिदास विश्वंभर बोंबले (वय- 40 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (थडी) येथे ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (थडी) येथील अल्पभूधारक शेतकरी हरिदास विश्वंभर बोंबले यांनी आत्महत्या केली आहे. हरिदास याने संताजी आंबेकर यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी सुनिता हरिदास बोंबले (वय- 38), मुलगा युवराज हरिदास बोंबले (वय -20) एक मुलगी आहे असा परिवार आहे. मुलीचा विवाह झाला आहे.
बँकेकडून आली होती नोटीस…
शेतकरी हरिदास बोंबले यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी येथून त्यांनी 183000 रुपये पीक कर्ज घेतले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याज भरण्यासाठी शेतकरी हरिदास विश्वंभर बोंबले यांना बँकेकडून कर्ज भरावे, अन्यथा आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीश पाठवण्यात आली होती.
आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज कसे फेडायचे याच विवंचनेतून शेतकरी हरिदास बोंबले होते. त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केली, असे हरिदास यांचा चुलत भाऊ माधव किशन बोंबले यांनी कुंडलवाडी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर हरिदास यांचे पार्थिव त्याच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. पाटोदा (थडी) येथील वैंकूठधाममध्ये हरिदास यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
