
4 तासात 4 मोठे संकेत…
जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये काहीतरी मोठ घडणार आहे. मागच्या चार तासात ज्या वेगाने हालचाली सुरु आहेत, त्यावरुन हा अंदाज लावला जातोय.
भारताकडून सर्वप्रथम सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांना संपवण्याच अभियान चालवलं जाऊ शकतं. 2016 आणि 2019 मधील हल्ल्यानंतर भारताने आधी सर्जिकल स्ट्राइक आणि नंतर एअर स्ट्राइक केला होता. या दोन्ही हल्ल्यात पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले होते.
पाकिस्तानवर वार होणार 4 संकेत
दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तात्काळ काश्मीर खोऱ्यात दाखल झाले. अमित शाह स्वत: सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेऊन आहेत. काश्मीरमध्ये शाह यांनी एलजी मनोज सिन्हा आणि सैन्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. कोणालाही सोडणार नाही, असं शाह या बैठकीनंतर म्हणाले. दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही, असं अमित शाह म्हणाले आहेत. शाह यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पहलगाम दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी पीएम मोदी सौदी अरेबियामध्ये होते. मोदी तिथला दौरा रद्द करुन तात्काळ देशात रवाना झाले. रिपोर्ट्नुसार पंतप्रधान मोदींनी भारतात येताना पाकिस्तानी एअर स्पेसचा वापर केला नाही. ते अन्य मार्गाने दिल्लीत आले. मोदी यांचा हा निर्णय पाकिस्तानसाठी थेट इशारा मानला जात आहे. दिल्लीत पीएम कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक घेणार आहेत. ही उच्च स्तरीय समिती आहे. यात सुरक्षेसंदर्भात मोठे निर्णय घेतले जातात.
पेहेलगाम घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्य प्रमुखांची बैठक घेतली. यात तिन्ही सैन्य प्रमुखांनी तयार असल्याच म्हटलं आहे. म्हणजे पुढच्या कारवाईसाठी सरकार जो काही निर्णय घेईल त्याच पालन केलं जाईल. मागच्यावेळी एअर फोर्सने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केलं होतं.
पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी म्हटलय की, भारताने हल्ला केल्यास सर्व पक्ष मिळून उत्तर देतील. फवाद यांच्याआधी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्याजा आसिफ यांनी पाकिस्तानचा या हल्ल्याशी संबंध नसल्याच म्हटलं आहे. सॅटलाइट रिपोर्ट्नुसार पाकिस्तान सीमेच्या आसपास त्यांची एअरफोर्स सक्रीय झाली आहे.