
मंत्री गुलाबराव पाटलांचे विधान चर्चेत, अजित पवारांना काय सल्ला दिला ?
पुण्याच्या वैशाली हगवणे हुंडाबळी प्रकरणात कारवाई करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात असून या प्रकरणात दोषींना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, जे कोणी अन्याय अत्याचार करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असं वक्तव्य राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जळगावमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
त्याचबरोबर “अजित दादांना मी कायम सांगितलं केवळ हगवणे नाही तर पक्षात घेतलेले सर्व लोक तपासा. जळगाव जिल्ह्यातीलही जे लोक अजितदादांनी पक्षात घेतले त्यांनाही तपासलं पाहिजे. अशी प्रतिक्रिया देत मंत्री गुलाबराव पाटलांनी अजित पवार गटात गेलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर व सतीश पाटील यांना चिमटा काढला आहे. जळगाव जिल्ह्यातील ज्यांना अजित पवारांनी आपल्या पक्षात घेतले आहे त्यांचेही काही दिवसानंतर असेच प्रकरण बाहेर येणार,” असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
यावळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळे विश्रामगृहातील कोट्यवधी रुपयांच्या प्रकरणावरुनही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. धुळे येथील शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी रुपये आमदारांसाठी आणल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे, मात्र या प्रकरणात तपास केला जाणार असून तपासात निष्पन्न होईल ते जनतेच्या समोर येईलअसे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार असलेले आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे अखेर पोलिसांना शरण आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून दोघेही फरार होते. अखेर आज पहाटे त्यांनी बावधन पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. दोन्ही आरोपीं पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात लपून बसले होते, अशीही माहिती समोर आली आहे.