
वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती, ती सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्वागतार्ह आहे. हा आपला ठेवा आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधील राहतं घर सरकारनं ताब्यात घेतलं.
तिथे मेमोरियल केलं. त्याचं स्वागत करतो असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत नेहमी सरकारवर टीका करत असतात. पण आज त्यांनी वीर सावरकरांच्या मुद्यावरुन सरकारच कौतुक केलं. “वाघ नखं आणली. तलवार आणली. त्यावर वाद आहे. वाघ नखं कुठे आहेत? निवडणुकीच्या आधी प्रदर्शनात फिरवली. आता वाघ नखांचं काय झालं ? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला.
नागपूरच्या भोसल्यांची तलवार आणली जाणार आहे. ठिक आहे. पण वीर सावरकरांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती, बॅरिस्टरी. त्याबाबत फडणवीस यांनी भूमिका मांडली. त्याला विरोध नाही. पण खरी पदवी आणा. कागदाचा तुकडा ब्रिटिशांनी जप्त केला तरी आम्ही सावरकरांना बॅरिस्टरच मानतो” असं संजय राऊत म्हणाले. “पण या देशाची मागणी जी आहे, ती वीर सावरकर यांना भारत रत्न देण्याची आहे. काल पद्म पुरस्करांचा सोहळा झाला. आम्हाला वाटत होतं की यावेळी तरी सावरकरांना भारत रत्न दिलं जाईल. आम्ही किती काळ वाट पाहिली. तुम्ही पदव्या आणाल. टोप्या आणाल. पण सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे. त्यांच्या विचारधारेत आहे. त्यामुळे त्यांना भारत रत्न देऊन टीकाकारांचे तोंड बंद केलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.
‘त्यासाठी आम्हाला मोदी, शाह आणि फडणवीस यांची गरज नाही’
आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने ती शिफारस का केली नाही ? मोदी आणि शाह यांनी त्यांच्या अख्तयारीत असताना, हातात असताना सावरकरांना भारत रत्न का दिला नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. बॅरिस्टरची पदवी आणा… सावरकरांनी ज्या समुद्रात उडी मारली तिथे तुम्ही डोकं टेकवाल… हे आम्ही वर्षानुवर्ष करत आहोत. त्यासाठी आम्हाला मोदी, शाह आणि फडणवीस यांची गरज नाहीये. जेव्हा फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता. तेव्हा ही पदवी महाराष्ट्राने दिली होती. महाराष्ट्राने सावरकरांचा सन्मान केला होता असं संजय राऊत म्हणाले.