काय आहे कारण…
ठाकरे बंधूंची जवळीकीचा महाविकास आघाडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस दूर राहण्याची शक्यता आहे. कारण विजयी मेळावा कोणत्या पक्षाचा नसून केवळ मराठीच्या मुद्द्यावर सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचं आवाहन ठाकरे बंधुंनी केलं आहे.
मात्र काँग्रेसने या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंसोबत नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस पक्षाकडून विजयी मेळाव्यासाठी कोणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आमंत्रण देऊनही काँग्रेस पक्षाकडून कोणीही उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
मनसे पक्षाची विचारधारा पटत नसल्याचं कारण देत काँग्रेस नेते विजयी मेळाव्याला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विजयी सभेकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. कारण पक्ष नेतृत्वाने विजयी सभेपासून अंतर राखण्याचा आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाविकास आघाडीवर परिणाम
राज आणि उद्धव एकत्र आले, तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, युतीच्या नव्या समीकरणांचा विचार करावा लागेल. राज ठाकरे यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा आक्रमकपणा महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना न पटणारा असू शकतो. त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत स्वतंत्र युती केली, तर महाविकास आघाडीची एकजूट कमजोर होऊ शकते. असात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्वतंत्र रणनीती आखावी लागू शकते.
