आंबेकरांनी स्पष्टच सांगितलं…
मागील काही महिन्यांपासून राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरला अन् सरकारला जीआर रद्द करावे लागले.
या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकलेले असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दिल्लीत एका पत्रकार परिषदेमध्ये आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी भाषावादावर मोठं विधान केले आहे. त्यांना विविधा राज्यांमध्ये सुरू असलेल्या भाषावादावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा असल्याचे स्पष्ट केले.
आंबेकर म्हणाले, संघाची खूप आधीपासून ही भूमिका आहे की, भारतातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. आपल्या आपल्या ठिकाणी लोक आपआपल्या भाषेत बोलत असतात. प्राथमिक शिक्षणही त्यातच घ्यायला हवा, सगळ्यांचा तोच आग्रह आहे. मला वाटते की, ही गोष्ट आधीपासूनच स्थापित आहे.
आंबेकर यांच्या या भूमिकेनंतर खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निशाणा साधला आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध. मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत? प्रत्येक भाषा ही राष्ट्र भाषा असल्याचे संघाचे म्हणणे. मग महाराष्ट्रात भाषेवरून भांडणे का लावली जात आहेत?, असा सवाल राऊतांनी केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर वाद आणखी चिघळला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मराठी लोकांविरोधात चिथावणीखोर विधाने केली आहे. महाराष्ट्राबाहेर या, आपटून मारू, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या घरात तर कुत्राही सिंहच असतो, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे. त्यावरून आता राजकारण तापले आहे. मात्र, अद्याप मनसेकडून त्यावर प्रतिक्रिया आलेली नाही.
