हिंदी-मराठी भाषा वादावर कंगना राणौत म्हणाली राजकीय फायद्यासाठी…
अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात पाऊल टाकलेली ‘क्वीन’ कंगना राणौत ही नेहमीच चर्चेत असते. कोणतीही भीडभाड न ठेवता कोणत्याही विषयावर ती अगदी स्पष्टपणे बोलतान दिसते.
सोशल मीडियावरही ती सक्रीय असेत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषेच्या वादावर तिनं प्रतिक्रिया दिली आहे. कंगना हिनं नाव न घेता ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये कंगनानं माध्यमाशी संवाद साधला. यावेळी आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना कंगनानं हिंदी-मराठी भाषा वादावर प्रतिक्रिया दिली. मराठी आणि हिमाचली लोकांची तुलना करत कंगना म्हणाली, “महाराष्ट्रीयन लोक खूप प्रेमळ असतात. अगदी आपल्या साध्या आणि निरागस हिमाचली लोकांसारखे. काही लोक राजकीय फायद्यासाठी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपली एकता विसरता कामा नये. मग ते महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण भारतातील लोक असोत किंवा इतर कुठलेही… सर्वजण आपल्याच देशाचा एक भाग आहेत. आपण आपल्या देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे, असं कंगना हिनं म्हटलं.
हिंदी आणि मराठी भाषावाद
हिंदी आणि मराठीतील वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय तापमान तापलं आहे. महाराष्ट्र सरकारने पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची करण्याचा आदेश जारी केला. राज्य सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध झाला. सरकारच्या या निर्णयाविरोधात ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे रॅली काढणार होते. महाराष्ट्र सरकारने या रॅलीपूर्वीच हिंदीबाबतचा सरकारी आदेश मागे घेतला. आदेश मागे घेण्यात आला असला तरी आता हा वाद मराठी विरुद्ध हिंदीपर्यंत येऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी शिकली जावी, असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धरला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहानाला उत्तर भारतीय नेत्यांकडून आव्हान दिलं जातंय.
