अंडरवर्ल्ड हादरवणारे ACP दया नायक आहेत तरी कोण ?
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांना निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी गृह विभागाने पदोन्नती दिली आहे. गुन्हेगारी जगात आणि महाराष्ट्र पोलिसात प्रसिद्ध असलेले दया नायक यांना आता ACP (सहाय्यक पोलीस आयुक्त) म्हणून बढती देण्यात आली आहे.
दया नायक यांना गृह विभागाने बढती दिली आहे. दया नायक यांच्याव्यतिरिक्त, मुंबई पोलिसांच्या आणखी तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना असलेल्या जीवन खरात, दीपक दळवी आणि पांडुरंग पवार यांना देखील बढती देण्यात आली आहे.
कोण आहेत दया नायक?
दया नायक 1995 मध्ये मुंबई पोलिसात रुजू झाले होते. ते सध्या गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटमध्ये तैनात आहेत. पण मुंबई पोलिसात त्यांची पहिली पोस्टिंग जुहू पोलीस ठाण्यात होती.
90 चे दशक, मुंबईत गुन्हेगारांचा सुळसुळाट आणि दया नायक यांची पोलीस दलात एंट्री
90 चं दशक हे वेगवेगळ्या घडामोडींनी ढवळून निघत होतं, विशेषत: आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर. 1993 मध्ये तर मुंबई बॉम्बस्फोटांनी केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण भारत हादरला होता. मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रभाव पोलिसांसाठी एक गंभीर आव्हान बनलं होतं. टोळीयुद्धाच्या घटना सामान्य होत्या. खंडणी, धमक्या आणि खून यामुळे शहरातील वातावरण असुरक्षित झाले होते.
या काळातच दया नायक हे मुंबई पोलिसात रुजू झाले. दया नायक यांचा लवकरच गुन्हेगारांशी आमनासामना झाला. 1996 मध्ये, त्यांनी दक्षिण मुंबईत छोटा राजन टोळीतील दोन गुंड विनोद मतकर आणि रफिक यांना चकमकीत ठार केलं. ज्याची मीडियामध्ये प्रचंड चर्चा झाली. त्यांच्या धाडसाची आणि चपळतेची चर्चा केवळ पोलीस वर्तुळातच नाही तर अंडरवर्ल्डमध्येही झाली.
1997 मध्ये, दया नायक यांनी अंधेरी येथे झालेल्या आणखी एका हाय-प्रोफाइल एन्काउंटरमध्ये छोटा राजनचा जवळचा सहकारी सतीश राऊत याला ठार केलं. या कारवाईत त्यांची अचूक माहिती आणि जलद कारवाईमुळे पोलीस विभागात त्यांचा दबदबा अधिक वाढला.
1998 पर्यंत, दया नायक हे मुंबई पोलिसांमध्ये एक प्रसिद्ध नाव बनले होते. त्यांनी अनेक मोठ्या आणि लहान गुन्हेगारांना लक्ष्य केले होते. त्यापैकी दाऊद इब्राहिमच्या टोळीतील काही गुन्हेगार होते. त्यांची बुद्धिमत्ता, माहिती देणाऱ्यांचे जाळे आणि अचूक नियोजन यामुळे त्यांना अनेक गुन्हेगारांशी सामना करण्यास मदत झाली होती.
1990 च्या दशकाच्या अखेरीस, दया नायक यांचे नाव घेताच अनेक अंडरवर्ल्ड डॉनचे देखील धाबे दणाणून जायचे असं म्हटलं जातं.
दया नायक यांच्या जीवनावर बॉलिवूड चित्रपट
दया नायक यांच्या कारकिर्दीवर बॉलिवूडमध्ये “अबतक छप्पन” हा चित्रपटही बनवण्यात आला आहे. नाना पाटेकर यांनी त्यात दया नायकची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची तेव्हा बरीच झाली होती.
दया नायक यांनी आतापर्यंत 84 एन्काउंटरमध्ये केले आहेत. 2000 सालानंतरहीदया नायक यांनी मुंबई पोलिसांच्या अनेक कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दाऊद इब्राहिम, अरूण गवळी, अमर नाईक आणि छोटा राजन यांच्यासारख्या मोठ्या गँगस्टरच्या ज्या टोळ्या होत्या त्यांच्या अनेक गुंडांचा खात्मा केला.
दया नायक स्वत:च अडकलेले चौकशीच्या घेऱ्यात
2006 साली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दया नायक यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचे गंभीर आरोप केले. एनडीटीव्हीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एका मराठी वृत्तपत्राने वृत्त दिले होते की, दया नायक यांनी त्यांच्या मूळ गावी येनहोल येथे त्यांच्या आई राधा नायक यांच्या नावाने एक हाय-टेक शाळा बांधली होती. ज्याच्या उद्घाटनासाठी अमिताभ बच्चन, सुनील शेट्टी यांच्यासारखे बॉलिवूड स्टार हजर होते.
या प्रकल्पावर कथित कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी असा आरोप करण्यात आला होता की, उपनिरीक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे इतके पैसे कुठून आले? त्यांच्यावर त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या काळात त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. परंतु एसीबी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करू शकली नाही आणि त्यांना जामीन मिळाला. त्यानंतरच्या तपासात नायक यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत आणि अखेर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. तसंच यथावकाश त्यांना पुन्हा एकदा पोलीस सेवेत घेण्यात आलं.
अनेक हाय-प्रोफाइल केसेस सोडविण्यात सहभाग
दया नायक यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (ATS) देखील काम केले आणि 2021 मध्ये अंबानी निवासस्थानाच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पथकाचा भाग होते. दया नायक काही खळबळजनक आणि हाय-प्रोफाइल प्रकरणांच्या तपासातही सहभागी आहेत. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्यांनी अभिनेता सलमान खानच्या घरावर केलेला गोळीबार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीची हत्या आणि घुसखोराने अभिनेता सैफ अली खानवर केलेला हल्ला यांचा समावेश आहे.
