
भाईंच्या वादग्रस्त मंत्र्यांची सुटका !
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री वादग्रस्त ठरले. या नेत्यांमुळे महायुती सरकारची प्रतिमा मलीन झाली. या नेत्यांवर कारवाईसाठी भाजपनं दबाव टाकून पाहिला.
मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उपमुख्यमंत्री आणि दोन पक्षांचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वपक्षीय नेत्यांचा बचाव केला. यासाठी त्यांना भाजपमधल्याच दोन नावांची चांगलीच मदत झाल्याचं समजतं.
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईच्या आमदार निवासातील कँटिन कर्मचाऱ्याला जेवणाच्या निकृष्ट दर्जावरुन मारहाण केली. तर मंत्री संजय शिरसाट विट्स हॉटेल खरेदी प्रकरण, नोटांनी भरलेली बॅगेच्या व्हिडीओमुळे वादात सापडले. प्राप्तिकर खात्यानं त्यांना नोटिसदेखील पाठवली आहे. मंत्री भरत गोगावले अघोरी पुजेमुळे वादात अडकले. तर राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या आईच्या मालकीच्या बारवर छापा पडल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या चर्चेत उपस्थित झाला. विशेष म्हणजे कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या बारमध्ये बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्या.
दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली. विधिमंडळात रमी खेळत असतानाच त्यांचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी कोकाटे यांना अँटी चेंबरमध्ये बरंच झापलं. पण त्यांचा राजीनामा घेतला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सर्व मंत्र्यांना समज दिली. वादग्रस्त विधानं करु नका, वर्तन चांगलं ठेवा, अशी समज त्यांना देण्यात आली. पण फडणवीस यांनी वादग्रस्त नेत्यांवर कारवाई करण्याचं धाडस दाखवलेलं नाही. यामागील कारणांचा उलगडा आता झालेला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हनी ट्रॅप प्रकरणात गंभीर आरोप आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. असा मुद्दा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खासगी बैठकांमध्ये उपस्थित केल्याचं समजतं.
विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळाच्या आवारातच राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यावरुन भाजपनं पडळकर यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. भाजप त्यांच्या एका मंत्र्यावर, एका आमदारावर कोणतीही कारवाई करत नाही, असा मुद्दा उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांनी महायुतीच्या बैठकांमध्ये उपस्थित केला. भाजपच्या दोन बड्या नेत्यांची नावं पुढे करुन, त्यांच्यावर न झालेल्या कारवाईचा विषय उपस्थित करुन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांचा बचाव केला.