
आरक्षणावरून राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजामध्ये पुन्हा एकदा वाद होताना दिसत आहे. राज्य सरकारने अलीकडेच मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शासन आदेश सुपूर्द केले होते.
महत्त्वाचे म्हणजे या जीआरमुळे मराठा समाजाला सरसरट आरक्षण मिळेल आणि ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येईल, असा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांनी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात या शासन आदेशाविरोधात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. अशातच सरकारचा जीआर न्यायालयात टीकणार नाही, असा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद केला आहे.
सरकारचं डोकं ठिकाणावर नाही आणि सरकारचा जीआर न्यायालयात टीकणार नाही, असा दावा करत प्रवीण गायकवाड म्हणाले की, 1 जून 2004 मध्ये खत्री कमिशनने कुणबीमध्ये ‘मराठा कुणबी’, ‘कुणबी-मराठा’ समावेशाला मान्यता दिला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मराठा जात ही तेव्हा ओबीसीत गेली आहे. त्यानंतर आम्ही सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यावेळी मी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांना मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागत आहेत. जर सगळ्या समाजांना आरक्षण दिलं, तर आरक्षणाचं औचित्य संपून जाईल. त्यामुळे खुल्या वर्गातील लोक आरक्षणात आले तर त्याचा उद्देशच संपून जातो, असे त्यांनी सांगितले असल्याचे गायकवाड म्हणाले.
प्रवीण गायकवाड म्हणाले की, मराठा आरक्षणावर माझा स्वत:चा 25 ते 30 वर्षांचा अभ्यास आहे. शिक्षण महागल्यामुळे आणि बेरोजगारीच्या समस्येमुळे काही प्रश्न उद्भवले आहेत. परंतु या समस्येवर फक्त आरक्षण हे उत्तर आहे, असे मला वाटत नाही. मराठा आणि ओबीसी समाज आरक्षण का मागत आहेत? कारण त्यांना माफक दरात शिक्षण मिळावं आणि सरकारी नोकरी मिळावी, ही अपेक्षा आहे. पण आता सरकार नोकरभरती करत नाही. खासगी कंपन्यांमध्येही फारशा नोकऱ्या उरलेल्या नाहीत. ही समस्या वेगळी असली तरी अनेकांना वाटतं की, त्यावर आरक्षण हा शाश्वत मार्ग आहे, असे सूचक वक्तव्य गायकवाड यांनी केले.
आमच्यासाठी महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे, असे स्पष्ट करताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, एसटी, एससी, ओबीसी, आणि ओपन यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. यासाठी सध्याच्या नेत्यांनी सुद्धा भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. कारण नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरत चालला आहे. नेत्यांनी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवता कामा नये. पण अलीकडे नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरत चालला आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी राज्यभरात कार्यक्रम घेणार आहोत. पहिली सभा 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या सभेला दीपक पवार, श्रीराम पवार, प्रकाश पवार आणि नितीन पवार हे संबोधित करतील. महाराष्ट्र धर्म हा कार्यक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे, असेही प्रवीण गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.