मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपने एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्यास मनसे (MNS) देखील प्रस्ताव स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे.
पालिका निवडणुकीत भाजपसोबत एकत्र येण्यास मनसे सकारात्मक असल्याची माहिती आहे. भाजपकडून प्रस्ताव आल्यास मनसे विचार करणार असल्याची माहिती आहे.
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरे यांना सोबत घेऊ, त्यांच्यासोबत युती करु असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. पण फडणवीसांच्या वक्तव्याअगोदर निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची एक बैठक झाली होती. त्या मंथन बैठकीत सर्व नेत्यांचे मतं जाणून घेतली. त्या बैठकीत एकमत झाले की आपण आता विचार न करता फक्त हिंदूत्वाच्या मार्गाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी आपण भाजपसोबत राहणे गरजेचे असल्याचे मत नेत्यांनी मांडले.
मनसे भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी सकारात्मक
लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला मदत केली आहे. विधानसभा जरी आपण स्वबळावर लढल्या आणि निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी आपण आता भाजपसोबतच राहिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केल्यानंतर याला आणखीच बळ मिळाले असून मनसे नेत्यांनी आम्ही सकारात्मक असल्याचे मत दिल्याची माहिती आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे देखील सकारात्मक असल्याच्या चर्चा आहेत.
फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये मैत्री
निवडणूक निकालानंतर अद्याप राज ठाकरे आणि भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची भेट झालेली नाही. शपथविधी समारांभाला देखील फडणवीस गैरहजर होते. परंतु फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जरी दोघांची मैत्री असली तर पक्षात मैत्री होते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
महायुती मनसे एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंना निवडणूक जड जाणार
राज्यातील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आपला शेवटचा गड म्हणजे मुंबई महानगरपालिका वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे शिवसेनेचा अभेद्य किल्ला अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. जर मनसे आणि भाजप, शिवसेना शिंदे एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक जड जाईल.
फडणवीसांना राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छा
विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत भाजपने राज ठाकरे यांच्या पक्षाचा विचार केला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढली. पण ठाकरेंच्या पक्षाला एकही जागेवर यश मिळालं नाही. विधानसभा निवडणुकीनंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या. तसेच ,पुढची पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल, असेही राज ठाकरे म्हणाले होते.
