बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणांवरुन सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे.या दोन्ही प्रकरणांनी हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या महायुती सरकारला चांगलाच घाम फोडला.
अशातच आता मराठा आरक्षणाचा लढा उभारणार्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन सरकारला धारेवर धरतानाच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनाही फटकारलं आहे.
मनोज जरांगेंनी मंगळवारी (ता.24) मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन पुन्हा एकदा गर्भित इशारा दिला आहे. तसेच येत्या 28 तारखेला बीड जिल्ह्यात सरपंच देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी काढण्यात येणार्या मोर्चातही सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याचवेळी त्यांनी लोकांनाही या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
‘कोणाचाही पण बाप येऊ द्या ते…’
सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण कोणाचाही बाप आला तरी दबू देणार नाही,असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.तसेच कोणाचाही पण बाप येऊ द्या, आपण हे मॅटर दबू देणार नाही,त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही,असा इशाराही जरांगे पाटील यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दिला आहे. मोबाईलमधून केलेले कॉल तपासायला सरकारला एवढा वेळ का लागतोय असा खडासवालही त्यांनी उपस्थित केला. बीड जिल्ह्यातील जनतेनं एकदा का तपास हातात घेतला तर मग सरकारला कळेल? असा इशाराही त्यांनी दिला.
राहुल गांधींवर हल्लाबोल
लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार यांनी सोमवारी (ता.23) परभणीतील मयत सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाची भेट घेतली. यानंतर त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी दलित होता आणि राज्यघटनेचं संरक्षण करत होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली. आरएसएसची विचारसरणी राज्यघटनेला संपवण्याची विचारसरणी आहे. ही 100 टक्के कस्टोडियल डेथ आहे. पोलिसांनी त्याची हत्या केली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी परभणी गाठत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पण त्याचवेळी ते बीडमधील मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले नाही. यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींवर संताप व्यक्त केला आहे. याबाबत ते म्हणाले, राहुल गांधी यांना रस्त्यात येताना गाडी लागली नसेल, त्यांच्याकडे डिझेलला पैसे नसतील. गरीब माणूस आहे, म्हणून आला नसेल, अशा खोचक शब्दांत जरांगेंनी राहुल गांधींना उपरोधिक टोलाही लगावला.
याचवेळी महायुती किंवा महाविकास आघाडी असू द्या यांचा एकदा भागलं की, त्यांना गोरगरिबाचं देणंघेणं राहत नसल्याची टीकाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांनी समोर येऊन एसपींना सांगितले पाहिजे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केलंय.
मनोज जरांगे पाटलांच्या मध्यस्थीनंतरच संतोष देशमुख यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी ताब्यात घेतला होता. यानंतर त्यांनी या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. तसेच त्यांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेटही घेतली होती.ते परत मस्साजोगला जाण्याची शक्यता आहे. तसेच ते बुधवारी(ता.25) परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी कुटुंबाची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
