केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे लोक दहशतवादी असल्याचे तारे मंत्री नितेश राणे यांनी तोडले होते.
त्यांच्या टीकेवर राजकीय वर्तुळातून संतापजनक प्रतिक्रिया येत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नितेश राणे यांना सुनावले आहे.
संयमी थोरात कडक शब्दात सुनावतात तेव्हा…!
केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगले पाहिजे, अशी आठवण करून देत नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा शब्दात थोरात यांनी सुनावले.
जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही, मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करताना शपथ घेतली आहे याची तरी आठवण ठेवावी आणि समाजात तेढ वाढणार नाही असे वर्तन करू नये, अशी अपेक्षा थोरात यांनी फडणवीस यांच्याकडून ठेवली आहे.
नितेश राणे नेमके काय म्हणाले?
सासवड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जान भरली. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनो तुम्ही एकटे नाही. आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत. राज्यात भगवादारी मुख्यमंत्री म्हणून तिथे आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही घाबरण्याची गरज नाही. केरळमध्ये हिंदूंची कमी होत चाललेल्या लोकसंख्येची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. हिंदूंचे ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये धर्मांतर करणे ही तिथे रोजची गोष्ट बनली आहे, असे सांगत केरळ हा मिनी पाकिस्तान असून म्हणूनच तिथे राहुल-प्रियांका निवडून येतात, असे नितेश राणे म्हणाले.
