संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका दाखल, अडचणी वाढण्याची शक्यता
संतोष देशमुख हत्याप्रकरणाला दिवसेंदिवस नवं वळण मिळत आहे. या हत्याप्रकरणामुळे गुन्हेगारी आणि राजकीय यांचे सखोल असणारे संबंध स्पष्ट होताना दिसत आहेत. अशातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
देशमुख यांच्या भावाने हायकोर्टात मुंडे यांना मंत्रीपदावरुन काढून टाकण्याची याचिका दाखल केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडेंबाबात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा दावा करण्यात आला असून त्याचा धनंजय मुंडे यांच्याशी थेट संबंध असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळं विरोधकांकडून मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे. देशमुख यांचे धाकटे बंधू म्हणजेच धनंजय देशमुख यांनी मुंडेंविरोधात मुंबई हायकोर्टात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्यात यावं अशी मागणी देशमुख यांच्या भावने केली आहे.
याचिकाकर्त्याचे गंभीर आरोप
याचिकार्त्यांच्या म्हणण्यानुसार, मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा बीडमधील एका शक्तिशाली गुन्हेगारी टोळीचे नेतृत्व करतो. त्याला राजकीय संरक्षण मिळते. कराड यांचे मुंडे आणि राज्यातील इतर प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, देशमुख यांच्या अपहरणाच्या वेळी पोलिसांनी त्वरीत कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. राजकीय दबावानंतरच एफआयआर नोंदवण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांने म्हटलं आहे.
तसेच, कराड हे आरोपींसोबत व्हिडीओ कॉलवर असताना गुंडांनी संतोषवर अत्याचार केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. यासोबतच, कराड यांच्याविरुद्ध खंडणी, धमक्या आणि अपहरणाच्या अनेक तक्रारी असूनही अधिकारी निर्णायक कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे. या याचिकेत बीडमधील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतील अपयशाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीदेखील याचिकेत करण्यात आली आहे.
