बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ऐनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून, ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि किरण गुजर यांनी केलेल्या चर्चेनंतर हाके यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
या घडामोडीत भरणे यांची शिष्टाई यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वांना आपुलकीने जोडणारा नेता हरपल्याने त्यांच्या स्मरणार्थ प्रा. हाके यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वतीने हाके यांच्याशी संवाद साधून त्यांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली होती, जी त्यांनी मान्य केली.
दरम्यान, प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, सहानुभूतीची लाट असली तरी ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांचे फोन आले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांचा फोन आल्यानंतर निर्णय बदलण्याचा विचार केला.
माघार घेत असताना हाके यांनी आपली भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले. ‘ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी माझा लढा सुरूच राहणार आहे. निवडणूक संपल्यानंतर मी माझ्या मागण्या सुनेत्रा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. तसेच सरकारने जाहीर केलेल्या १८ महामंडळांना अद्याप अध्यक्ष नेमले नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ‘निवडणूक १५ दिवसांची असली तरी आमचा लढा कायम राहणार आहे. आम्ही थांबणार नाही,’ असा इशाराही हाके यांनी दिला.
