उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा राजकीय इतिहास !
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलिकडेच अचानक राजीनामा दिल्यानंतर, सध्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी वेगाने सुरू आहे. भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही पक्षांकडून आपापले उमेदवारांच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे.
पुढच्या महिन्यात ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सुरूवातीला ही निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत असतानाच विरोधी इंडिया आघाडीकडूनही उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. पण या निवडणुकीपूर्वीही भारतात आतापर्यंत उपराष्ट्रपती पदासाठी एकूण १६ निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी ४ निवडणुका बिनविरोध जिंकल्या गेल्या.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांची दोनदा राष्ट्रपतीपदी निवड
भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या इतिहासात अनेक वेळा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वात आधी १९५२ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. त्या वेळी त्यांच्या विरोधात दाखल झालेले एकमेव नामांकन पत्र रद्द ठरले होते. त्यानंतर १९५७ मध्येही तेच एकमेव वैध उमेदवार ठरल्याने दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. 0१९७९ मध्ये मोहम्मद हिदायतुल्ला बिनविरोध उपराष्ट्रपती झाले. तर १९८७ मध्ये डॉ. शंकर दयाल शर्मा यांची निवड झाली. त्या वेळी इतर २६ उमेदवारांची नामांकन पत्रे अवैध ठरली होती.तर आतापर्यंत झालेल्या सर्व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये एकूण १० उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. यामध्ये एका निवडणुकीत तीन तर दुसऱ्या एका निवडणुकीत सहा उमेदवार उतरले होते.
५ उपराष्ट्रपतींनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच दिला राजीनामा
पाच उपराष्ट्रपतींनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. २००२ मध्ये कृष्णकांत यांचे निधन झाले. व्ही.व्ही. गिरी, आर. वेंकटरमण आणि शंकर दयाळ शर्मा यांनी राष्ट्रपती होण्यासाठी त्यांचा कार्यकारळ पूर्ण होण्यापूर्वीच उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होती. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर त्यांचे पद रिक्त झाले. त्यानंतर १९६९ मध्ये व्ही.व्ही. गिरी उपराष्ट्रपती झाले. १९८७ मध्ये वेंकटरमण आणि १९९२ मध्ये शंकर दयाळ शर्मा यांनीदेखील कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. जगदीप धनखड यांनीदेखील कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गेल्या आठवड्यात ‘आरोग्याच्या कारणास्तव’ उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला.
२००२ : भैरोंसिंग शेखावत उपराष्ट्रपती
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भैरोंसिंग शेखावत यांची २००२ मध्ये उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. या निवडणुकीत शेखावत यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. देशाचे उपराष्ट्रपती होणारे शेखावत हे भाजपशी संबंधित पहिले व्यक्ती ठरले. यानंतर २००७ मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली. मात्र काँग्रेस-युपीएच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांच्या विरोधातील ही लढत त्यांनी गमावली.
उपराष्ट्रपती निवडणुकीबद्दल विशेष माहिती
आगामी १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने (EC) एक विशेष पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. या पुस्तिकेत मागील सर्व उपराष्ट्रपती निवडणुकांचा आढावा, निवडणुकीची प्रक्रिया आणि घटनात्मक तरतुदींचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तिकेत १६ उपराष्ट्रपती निवडणुकांबाबतची मनोरंजक माहिती देण्यात आली असून, मतदान पद्धती आणि उमेदवारी प्रक्रियेचा तपशीलवार आढावा घेतला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना उपराष्ट्रपती निवडणुकीबद्दल जागरूक करणे हा आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीत कधी आणि किती मते अवैध ठरली
उपराष्ट्रपती पदासाठीचे निवडणूक मंडळ तुलनेने लहान आहे. यात फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य – नामांकित सदस्यांसह – सहभागी होतात. तथापि, जवळजवळ प्रत्येक निवडणुकीत काही मते अवैध ठरली आहेत.१९६२ च्या निवडणुकीत सर्वाधिक १४ मते अवैध ठरली. त्यानंतर १९६७ मध्ये ३, १९७४ मध्ये १०, १९८४ मध्ये ३०, १९९२ मध्ये १०, १९९७ मध्ये तब्बल ४६, २००२ मध्ये ७, २००७ मध्ये १०, २०१२ मध्ये ८, २०१७ मध्ये ११ आणि २०२२ मध्ये १५ मते अवैध आढळली.
