
दैनिक चालू वार्ता धाराशिव/प्रतिनिधी -समीर मुल्ला
भूम पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर पैशाच्या मोबदल्यात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून पुढील तपासात आणखी साथीदारांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
मंगळवार (दि09)रोजी सायंकाळी 05.00 वाजणेच्या सुमारास ईट शिवारातील ईट ते जातेगाव जाणारे रोडवर किनारा हॉटेलचे जवळ श्रीकृष्ण अर्जुन बांगर वय 39 वर्ष रा. पाटोदा ता. पाटोदा जि. बीड व त्यांचे सहकारी रविन्द्र राख त्यांचे बोलेरो गाडी मध्ये जात असताना गाडी थांबवण्यास सांगुन अनोळखी चार इसमांनी जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करून जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी जबाबावरून पो.स्टे. वाशी गु.र.न. 290/2025 कलम 109 (1),115 (2), 118 (1) 351 (3),3 (5) भा. न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर गुन्ह्याचा तपास करून नमूद गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक यांना गोपनीय माहितीदाराकडून यातील संशयित आरोपी बाबत माहिती मिळाली. त्यांनी आरोपी सलमान पठाण, रा. भूम व रितेश अंधारे, रा. हाडोंगरी यांना येरमाळा उड्डाणपुलाच्या खालून ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्या संदर्भात अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांचे अन्य साथीदारांची माहिती दिली. तसेच पैशाच्या मोबदल्यात सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यावरून वर नमूद दोन आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे वाशी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई ही धाराशिव पोलीस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार,पोलीस हावलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, दयानंद गादेकर, चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे, प्रकाश बोईनवाड यांचे पथकाने केली आहे.