मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य !
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ढासळली आहे. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दीची समस्या असून हजारो प्रवासी दररोज रेल्वेच्या दरवाजात उभे राहून लोंबकळत प्रवास करतात.
दुसऱ्या बाजूला बसने प्रवास करणंही तितकंच अवघड आहे. वाहतूक कोंडीमुळे बसेस कासवगतीने धावत असतात. मात्र, आता मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईत अनेक रस्ते बांधले जात असून काही रस्त्यांना समांतर रस्ते, काही ठिकाणी नवे पूल उभारले जाणार आहेत. तर, काही ठिकाणी भूयारी मार्गांचं जाळं तयार केलं जात आहे. यासह आम्ही उपनगरीय रेल्वेचा कायापालट करणार आहोत.”
मुंबई लोकलचा कायापालट करणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दररोज ९० लाख लोक या लोकलने प्रवास करतात. परंतु, लोकलमध्ये इतकी गर्दी असते की खरा मुंबईकरच या रेल्वेने प्रवास करू शकतो. बाहेरचा माणूस या लोकल ट्रेनमध्ये प्रवेश सुद्धा करू शकत नाही. या लोकलचा विकास करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की सुंदर अशी मेट्रो मुंबईकरांना दिल्यानंतर आता लोकल रेल्वेचा कायापालट करणं आवश्यक आहे.”
वातानुकूलित ट्रेनचं तिकीट किती असणार?
“आम्ही मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित करत आहोत. तसेच या लोकलचे सर्व दरवाजे आपोआप बंद होतील. त्यामुळे कोणीही लोंबकळत प्रवास करू शकणार नाही. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही मेट्रोइतकीच सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार आहोत. मात्र, ते करत असताना द्वितीय श्रेणी डब्याचं तिकीट एक रुपयाने देखील वाढवणार नाही. आत्ताचा जो तिकीट दर आहे त्याच दराने आम्ही मुंबईकरांना वातानूकुलित ट्रेनचं तिकीट देणार आहोत.
वॉटर टॅक्सी सुरू करणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा देखील सुरू करत आहोत. मुंबई-अलिबाग रो-रोच्या धर्तीवर मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होतील. वॉटर टॅक्सीचं मोठं जाळं तयार केलं जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर प्रवासी वॉटर टॅक्सीने गेट वे ऑफ इंडियाला जाऊ शकतात.


