आता दिल्लीवरून थेट आदेश; महाभूकंप होणार ?
महायुतीमधील दोन पक्ष आता दोन ध्रुव होण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपने शिंदे सेनेला अनेक ठिकाणी सुरुंग लावल्याने अनेक ठिकाणचे बुरूज ढासळत आहेत.
त्यामुळे महायुती टिकवायची की पक्ष टिकवायचा असा मोठा पेच शिंदे सेनेसमोर आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवारच नाही तर जिल्हाध्यक्ष सुद्धा पळवण्याचा प्रयत्न होत असल्याने शिंदे सेना रक्तबंबाळ झाली आहे. भाजपने त्यांचे अनेक बुरूज ढासळ्याचा चंगच बांधला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी करून आले तरी नेत्यांची पळवापळवी थांबलेली नाही. तर आता दिल्लीवरून थेट आदेश धडकले आहेत. महायुतीत महाभूकंप होणार का?
सबुरीचा सल्ला की मोठे वादळ येणार?
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील फोडाफोडीच्या भाजपच्या चालीवर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यानंतरही राज्यात छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री आणि इतर ठिकाणी अनेक नेत्यांचा भाजप प्रवेश शिंदे सेनेची डोकेदुखी ठरला आहे. यामुळे युतीत तणाव वाढला आहे. आता भाजप पक्ष श्रेष्ठीचा राज्यातील नेत्यांना संयमाने वागण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक होईपर्यंत वेट अँड वॉच अशी भाजपची भूमिका असू शकते.
मुंबई महापालिकेचा गड एकट्याने लढणार भाजप?
मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपने सावध पावले उचलल्याची सूत्रांची माहीती आहे. शिंदे गटातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने थेट हस्तक्षेप न करता ‘सबुरी’चा सल्ला केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती आहे. महापालिका निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत मानली जात असून, शिंदे गटासोबत युती कायम ठेवायची की स्वतंत्र भूमिका घ्यायची, यावर चर्चेचा फेरी सुरू आहे.
शिंदे-फडणवीस सरकार स्थिर ठेवण्यासाठी भाजप नेतृत्व सावधगिरीची भूमिका घेत असून, कोणताही घातक निर्णय टाळण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे समोर येत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप शिंदे गटासोबत राहणार की एकट्याने लढणार, यावर अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे. दरम्यान, ठाकरे गट शिंदे गटावर सतत निशाणा साधत असून, शिंदेंविरुद्ध वाढत्या आरोपांमुळे युतीत तणाव वाढल्याचा सूर आहे. पण तुझे-माझे जुळेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था दोन्ही पक्षांची असल्याची चर्चा होत आहे.


