ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा शहरातील दिवा स्टेशन ते साबे गांव रस्त्यावरील गतिरोधक सध्या वाहन चालक व नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. सदर रस्त्यावरील सर्वच गतिरोधक हे तांत्रिक निकष डावलून आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले असल्याने सदर गतिरोधक तोडून नवीन अधिकृत गतिरोधक बांधण्यासाठी शिवसेना नगरसेवक अँड आदेश भगत यांनी ठाणे महानगर पालिका आयुक्त आणि नगर अभियंता यांना लेखी निवेदन दिले आहे.
मुंबई उच्च न्यायालयान केवल सेमलानी विरूध्द बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त या प्रकरणात दिलेल्या निकालानुसार राज्यातील सर्व गतिरोधक हे ‘इंडियन रोड्स काँग्रेस’ च्या मार्गदर्शक तत्वानुसार असणे अनिवार्य आहेत. मात्र दिवा शहरात या नियमांचे सर्रास उल्लंघन होतना दिसत असल्याचे अँड आदेश भगत यांचे म्हणे आहे. नियमांनुसार गतिरोधकांची उंची १० सें.मी. आणि त्रिज्या १७ सें.मी. असावी लागते. परंतु दिवा स्टेशन ते साबे गाव रोड वरील गतिरोधक हे प्रमाणापेक्षा जास्त उंच आणि तीव्र आहेत. या चुकीच्या गतिरोधकांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना पाठीच्या कण्यांचे, मणक्याचे आणि मानदुखीचे गंभीर आजार जडत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी हे गतिरोधक जीवघेणे ठरत असल्याचे अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या असल्याचे नगरसेवक अँड.आदेश भगत यांनी म्हटले आहे.
त्याशिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार गतिरोधकांवर पांढरे काळे पट्टे, ल्युमिनस पेंट किंवा रिफलेक्टर्स असणे आवश्यक यक असतांना सदर गतिरोधक न दिसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. दिवा स्टेशन ते साबे गांव रोडवरील जे गतिरोधक नियमात बसत नाहीत, ते गतिरोधक अनधिकृत मानून त्वरीत तोडून पुन्हा अधिकृतरित्या बांधले जावेत व दिवेकर नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून दयावेत असे नगरसेवक अँड आदेश भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
