ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा : दिवा परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिवा शिळ नागरिक हक्क समितीच्या वतीने आज ठाणे महानगरपालिकेच्या मा. महापौर, मा. उपमहापौर व अतिरिक्त आयुक्त,गटनेते यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, दिवा प्रभाग समिती हद्दीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेने अशा बांधकामांवर कठोर कारवाई करणे बंधनकारक असतानाही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून शहराच्या नियोजनावरही परिणाम होत आहे.
तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच Right to Service Act, 2015 अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासणी करून अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी समितीचे सदस्य हिरा पाटील, अॅड. रोहिदास मुंडे, सचिन पाटील, प्रकाश पाटील तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
समितीच्या वतीने प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
