आयपॅकच्या प्रमुखाला EDकडून अटक…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. कोळसा घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत राजकीय सल्लागार कंपनी ‘आय-पॅक’चे संचालक विनेश चंदेल यांना अटक केली आहे.
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) ही कारवाई करण्यात आली असून, दिल्ली न्यायालयाने त्यांना १० दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला २ एप्रिल रोजी ईडीने चंदेल यांच्या दिल्लीतील ठिकाणांवर छापेमारी केली होती. तसेच आय-पॅकचे सह-संस्थापक ऋषी राज सिंह (बेंगळुरू), प्रतिक जैन आणि ‘आप’चे माजी संचार प्रभारी विजय नायर (मुंबई )यांच्या मालमत्तांचीही झडती घेतली होती.
कोळसा चोरीच्या घोटाळ्याचा आरोप
याआधी 8 जानेवारी रोजीच ईडीने आयपॅकच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या होत्या. ईडीचा हा तपास नोव्हेंबर 2020 मध्ये दाखल केलेल्या एका एफआयआरवर आधारित आहे.
या एफआयआरमध्ये पश्चिम बंगालमध्ये आयसन सोल आणि आसपासच्या कुनुस्तोरिया व काजरा या भागातील ईस्टर्न कोल्ड फील्ड्स लिमिटेडच्या खाणींशी संबंधित कोट्यावधी रुपयांच्या कोळसा चोरीच्या घोटाळ्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान असे समोर आले आहे की, एका हवाला ऑपरेटरने आय-पॅकच्या ‘इंडियन पीएसी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीसाठी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले होते. यानंतर आता ईडी या संपूर्ण नेटवर्कचा आणि त्यातील इतर सहभागींचा कसून तपास करत आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या अटकेमुळे राजकारण तापले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी याला ‘लोकशाहीवरचा हल्ला’ म्हटले आहे. यामुळे आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांच्या प्रचारावर प्रभाव पडणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
