
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा :-दि.९. राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च ते एप्रिल २०२२या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावीचा निकाल २० जूनपर्यंत तर बारावीचा निकाल १० जूनला लागणार असल्याची माहिती एसएससी बोर्डाकडून आज देण्यात आली आहे.
बोर्डाने सांगितले की, दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. दहावी आणि बारावीच्या एकुण ३० लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यांच्या निकालाची तारीख आता जाहीर झाली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करावा लागला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्चपासून तर १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली होती. विद्यार्थी करोना बाधित झाल्याने किंवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकल्याने ५ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती.
राज्यात २१ हजार ३८४ ठिकाणी झाली परीक्षा
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू झाली होती. १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून राज्यात २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा झाली आहे. आता या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.
राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात ६ लाख २२ हजार ९९४ विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे तर ४ लाख ३७ हजार ३३६ कला शाखेचे होते. वाणिज्य शाखेतील ३ लाख ६४ हजार २६२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ५ हजार २०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर टेक्निकल सायन्सच्या ९३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.