दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई | शिवसेनाफुटी, शिवसेनेच्या नेत्यांची पळापळ आणि शिवसेनेच्या अस्तित्वावर आलेले आस्मानी संकट या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्राला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक प्रदिर्घ मुलाखत दिली.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ती संपादीत केली आहे.
त्यात उद्धव ठाकरेंनी पक्षाची वाताहात आणि त्यांचा झालेला विश्वासघात यावर भाष्य केले. तसेच त्यांनी आगामी काळात शिवसेनेची वाटचाल काय? याविषयी देखील सांगितले. त्यांनी शिवसेनेच्या बंडखोरांवर आणि त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर देखील कडक शब्दात टीका केली.
त्यांच्या या मुलाखतीच्या प्रसिद्धीनंतर भाजप नेत्यांनी त्यांची टिंगल केली आणि त्यांच्या मुलाखतीवर भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या या मुलाखतीला फिक्स मॅच असे म्हंटले आहे. तर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी या मुलाखतीवर टीका केली. टोकदार प्रश्नांना घाबरणारे पुढारी आपल्या हुजऱ्यांनाच मुलाखती देतात, असे वागळे म्हणाले होते.
यानंतर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं, अशा स्वरुपाचा गंभीर आरोप राणेंनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी फुटलेला पेपर सोडवला, असेही ते म्हणाले.
धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांना न शोभणारे आहे. गेलेल्या लोकांना गद्दार म्हणून तुम्ही योद्धा होत नाहीत. संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांच्या या खळबळजनक मुलाखतीनंतर त्यांंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या एका जुन्या मुलाखतीचा फोटो आणि आताच्या मुलाखतीचा फोटो टाकला होता. त्यांनी त्यांच्या त्या पोस्टला सत्ता असतानाची मुलाखत आणि सत्ता गेल्यावरची मुलाखत असे नाव दिले होते.
उद्धव ठाकरे यांना सत्ता असताना बाळासाहेब ठाकरे आठवत नाहीत. त्यांना सत्ता गेल्यावर बाळासाहेब ठाकरे आठवले. उजेडात त्यांना बाळासाहेब ठाकरे आठवले नाहीत. अंधारात त्यांना बाळासाहेब ठाकरे आठवत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
