
महायुतीचं सत्ता स्थापनेचं घोंगड अजून भिजत पडलंय. एकीकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे.
हे कोड सोडवण्यासाठी आज भाजपचं निरीक्षक पथक मुंबईत दाखल झालंय. हे निरीक्षक पथकाकडून मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा होणार आहे.
मुख्यमंत्री कोण होणार? कोणाच्या गळ्यात सीएम पदाची माळ पडणार याबाबत तर्क-वितर्क काढले जात आहेत. त्याचदरम्यान शिंदे गटातील नेत्याने मोठं विधान केलंय. भाजप महाराष्ट्रातही धक्का तंत्र अवलंबणार असल्याची आता पुन्हा एकदा सुरू झालीय.
तो भाजपचा प्रश्न
भाजप राजकारणात धक्का तंत्राचा वापर वारंवार करत असते. मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजपने धक्का तंत्र वापरत अनेकांना आश्चर्यचकित केलंय. आता महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपदावरून धक्का तंत्र अवलंबल जाणार असल्याची चर्चा सुरू झालीय. याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुतोवाच केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपने काय ठरवलं आहे त्याची कोणालाच कल्पना नाहीये. नेमका मुख्यमंत्री कोण असेल हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
आम्ही सगळे अधिकार भाजपच्या नेत्यांना दिले आहेत. चार तारखेपर्यंत हा निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा आहे. मात्र भाजपचे धक्का तंत्र अनेक वेळा पाहिलंय. मध्य प्रदेश, राजस्थान येथे त्यांनी धक्का तंत्राचा वापर केलाय. महाराष्ट्रातदेखील धक्का तंत्र वापरलं तर आश्चर्य वाटायला नको असं विधान संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या विधानामुळे धक्का बसलाय. दरम्यान भाजपचा निर्णय येत नाही तोवर धाकधूक वाढलीय. ज्या नावाची ते घोषणा करतील त्याला आमचा पाठिंबा असेल, असेही शिरसाट म्हणालेत.
आज सुटणार तिढा
दरम्यान आज भाजपची बैठक होणार आहे. अमित शहाबरोबरदेखील व्हिडिओ कॉन्फरस द्वारे बैठक होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये सगळा तिढा सुटेल. कोणी आढेवेढे घेणार नाही. सरकार चालवायला ऍडजस्टमेंट करावी लागते. सगळी खाते एकाच पक्षाकडे न जाता विभागून जातील असेही संजय शिरसाट म्हणालेत.
पुढे बोलताना संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. आम्ही काय करू काय नाही तो आमचा प्रश्न आहे तुम्ही नाक खूपसू नका. 2019 ला मुख्यमंत्री झाले. तेव्हा जर गृहखाते घेतलं असतं आणि काही करता आलं असतं असं जर वाटत असेल. मुख्यमंत्रीपदापेक्षा गृहमंत्री मोठा ही चुकीची संकल्पना . कोणत्याही खात्यावर काम करता येतं. नगर विकास खातं असतानादेखील एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात काम करून दाखवलं होतं.