
राज्यात नव्हे तर केंद्रात वर्णी ?
अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे हे सध्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलत असताना, ‘मी आता माजी खासदार असून व्यासपीठावर बसलेले सर्वच आजी आमदार आहेत’असे वारंवार सांगत असतात, नगर तालुक्यातील अकोळनेर येथे धर्मबीज सोहळ्याच्या धर्मध्वज अनावरण सोहळ्याप्रसंगी सुद्धा खासदार सुजय विखे पाटील यांनी भाषणामध्ये उल्लेख करताना, व्यासपीठावर असलेले दोन आजी आमदार आहेत.
मात्र मी माजी खासदार असून मी फक्त बोलण्याचं काम करू शकतो, असं वक्तव्य केलं होतं.
यावर बोलताना राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले आहे की, ‘लवकरच आम्ही सुजय विखे पाटील यांना आजी करण्याचं काम करणार आहोत. त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवणार आहोत. मात्र ते राज्यात येऊ नये असे आमची इच्छा आहे. कारण ते राज्यात आले तर आमचे मंत्रीपद अडचणीत येईल. असे होऊ नये म्हणून त्यांचे पुनर्वसन आम्ही राज्यात नव्हे ते केंद्रात करणार असल्याचा मिश्किल टोला आमदार शिवाजी कर्डिले यांनी लगावला आहे.
सुजय विखे पाटील यांची राज्यात नव्हे तर केंद्रात वर्णी लागणार?
गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी भाजप आमदारांच्या सत्कार समारंभात आपल्या पुनर्वसनाची मागणी केली होती. नगर शहरात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नवंनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या सत्कार समारंभासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह महायुतीच्या दहा पैकी आठ आमदारांनी हजेरी लावली.
या सत्कारसमारंभामध्ये माजी खासदार सुजय विखे यांचा देखील सत्कार करण्यात आला, यानंतर आपल्या भाषणांमध्ये बोलताना सुजय विखे यांनी म्हंटलं की, या मंचावर सर्वच “आजी” आहेत मी एकटाच “माजी” आहे तर माझ्याकडेही सर्वांनी लक्ष द्यावं, आणि माझं ही पुनर्वसन करावं असं म्हटलं होतं. विखे यांच्या विनंतीला प्रतिसाद देत सर्व आमदारांनी जिल्ह्यातील महायुतीच्या यशामध्ये विखेंचा सहभाग मोठा असल्याने तुमचं पुनर्वसन निश्चित होईल, असं आश्वासन दिलं होतं. अशातच आता शिवाजी कर्डिले यांनी सूचक वक्तव्य केल्याने सुजय विखे पाटील यांचे राज्यात नव्हे तर केंद्रात वर्णी लागते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.